धान खरेदी केंद्रावरील जाचक अटी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खरीप हंगामातील धान विक्रीसाठी बाजारपेठेत येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामातील धान विक्रीसाठी बाजारपेठेत येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जात आहे. मात्र खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केला जात नसून अनेक जाचक अटी शासनाने लागू केल्या आहे. त्यामुळे आधीच परतीच्या पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने या जाचक अटी त्वरीत रद्द करुन शेतकºयांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी खचला असून त्याला आधाराची गरज आहे.मात्र जेव्हा शेतकरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेत आहेत. तेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना खरेदीसाठी विविध अटी लागू केल्या जात आहे.
परतीच्या पावसामुळे पाखड झालेला धान सुध्दा खरेदी नकार दिला जात आहे. तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी अद्यापही केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाकडे पुरेशी यंत्रणा सुध्दा नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, पाखड धानाची खरेदी करण्यात यावी आणि धान खरेदीसाठी लावलेल्या जाचक अट्टी त्वरीत रद्द करण्यात याव्या. शेतकºयांना धानाचे चुकारे त्वरीत करण्यात यावे. यासंबंधीचे पत्र देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शासनाला दिले आहे.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे. कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.