अटलजींना ऐकण्यासाठी उसळला होता जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:45 AM2018-08-17T00:45:41+5:302018-08-17T00:46:48+5:30

आपल्या आमोघ वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करणारे कवीहृदयाचे अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्यासाठी भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर जनसागर उसळला होता. २००४ च्या एप्रिल महिन्याच्या झालेली अटलजींची भंडारा येथील प्रचार सभा आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

Atalji was excited to hear Jansagar | अटलजींना ऐकण्यासाठी उसळला होता जनसागर

अटलजींना ऐकण्यासाठी उसळला होता जनसागर

googlenewsNext
ठळक मुद्देअमोघ वाणीने श्रोते मंत्रमुग्ध : १४ वर्षांपूर्वी भंडारा येथे झालेल्या सभेतील आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आपल्या आमोघ वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करणारे कवीहृदयाचे अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्यासाठी भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर जनसागर उसळला होता. २००४ च्या एप्रिल महिन्याच्या झालेली अटलजींची भंडारा येथील प्रचार सभा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. जीवाचे कान करुन अटलजींचा एक-एक शब्द अनेकांनी आपल्या हृदयात साठवून ठेवला. गुरुवारी अटलजींच्या निधनाचे वृत्त धडकताच या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभेच्या एप्रिल २००४ साली अटलजी भंडारा शहरात आले होते. भाजपाचे उमेदवार शिशुपाल पटले यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलावर सभा आयोजित होती. गर्दीने खचाखच भरलेल्या या मैदानावर अटलजींचे सायंकाळच्या सुमारास निळ्या रंगाच्या कारमधून आगमन झाले. भंडाराच्या भूमीवर पाय ठेवताच त्यांना पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. अटलजींना जवळून पाहता यावे म्हणून प्रत्येकजण धडपडतांना दिसत होता. यानंतर अटलजींचे मंचावर आगमन झाले. आपल्या ओघवता शैलीने त्यानी भंडारेकरांच्या हृदयात हात घातला. त्यावेळी अटलजी म्हणाले होते ‘जनमत ही तय करेगा प्रधानमंत्री’. या प्रचार सभेनंतर भाजपाचे शिशुपाल पटले निवडणूक जिंकले. खरे श्रेय अटलजींच्या याच सभेला जाते, असे जुने जानते नागरिक सांगतात.
अटलबिहारी वाजपेयी व भंडारा जिल्ह्याच्या ऋणानूबंध फार जुना आहे. गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होण्यापुर्वी मार्च १९७२ साली ते भारतीय जनसंघाच्या कार्यक्रमासाठी ते गोंदियात आले होते. तर १९ फेब्रुवारी १९७८ रोजी तुमसर येथे विधानसभेच्या प्रचारसभेला त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते देशाचे विदेशमंत्री होते. १९८० साली लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा शिवाजी स्टेडीयम (चिचबन मैदान) येथे झाली होती. या सभेने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. ३० नोव्हेंबर १९८३ रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या भवनाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्याच हस्ते करण्यात आले. तर १० जानेवारी १९८६ रोजी साकोली येथे झालेल्या किसान संमेलनात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत शामरावबापू कापगते, राधेश्याम अग्रवाल (बाथड), महादेवराव शिवणकर, डॉ. खुशाल बोपचे उपस्थित होते. पालांदूर येथील गोविंद विद्यालयात १९८७ साली अटलजी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत बापूसाहेब लाखनीकर होते. १९९० साली गांधी मैदानातील सभाही अनेकांच्या स्मरणात आहे. रामभाऊ आस्वले यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेली सभा सर्वांच्या स्मरणात आहे.
भंडारा येथील १९८० च्या सभेतील आठवण सांगताना भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी भावविभोर झाले. ते म्हणाले, अटलजींचा सभेतील एकुणएक शब्द आजही माझ्या कानात गुंजत आहे. ते म्हणाले होते, ‘राजनारायणजी बडे सहासी व्यक्तीमत्व के धनी है, वह बहुत बोलते है, लेकिन कहनेके लिए साहस की आवश्यकता होती है. लेकीन चुप रहना हो तो विवेक बडा जरुरी है.’ राजनारायण यांनी अटलजींची साथ सोडून चरणसिंग यांच्यासोबत लोकदलात प्रवेश केला होता. त्यावरुन अटलजींनी आपल्या भाषणातून अशी कोटी केली होती.
करोडो देशवासीयांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता ऐकण्याचे भाग्य भंडारातील जुन्या जानत्या नागरिकांना लाभले.
भंडारा जिल्ह्यासोबत अटलजींचे जवळचे नाते
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भंडारा जिल्हा यांचे अगदी जवळचे नाते आहे. आपल्या प्रदिर्घ राजकीय जीवनात त्यांनी अनेकदा भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. ज्या-ज्यावेळी अटलजींची सभा झाली. तेव्हा तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी चाहत्यांची प्रचड गर्दी झाली होती. अटलजींची साधी राहणी अनेकांना प्रभावीत करीत होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मालगावे यांनी अटलजींच्या भंडारा दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजातशत्रु व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या अटलजींकडे बघताच राष्ट्रभक्तींचा प्रत्यय येत होता. त्यांना अगदी जवळून पाहण्याच्या व ऐकण्याचा योग आला हे माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले.

Web Title: Atalji was excited to hear Jansagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.