Vat Purnima 2025: वट पौर्णिमेच्या व्रताबरोबर प्रेमाचे बंध अतूट व्हावे यासाठी प्रेमानंद महाराजांनी दिला मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 07:05 IST2025-06-10T07:00:00+5:302025-06-10T07:05:01+5:30

Vat Purnima 2025: आज वट पौर्णिमा, वडाच्या झाडाची पूजा करून सौभाग्य मिळावे म्हणून प्रार्थना तर कराच, शिवाय प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला मंत्रदेखील लक्षात ठेवा.

Vat Purnima 2025: Premanand Maharaj gave a mantra to keep the bond of love unbreakable along with the Vat Purnima fast! | Vat Purnima 2025: वट पौर्णिमेच्या व्रताबरोबर प्रेमाचे बंध अतूट व्हावे यासाठी प्रेमानंद महाराजांनी दिला मंत्र!

Vat Purnima 2025: वट पौर्णिमेच्या व्रताबरोबर प्रेमाचे बंध अतूट व्हावे यासाठी प्रेमानंद महाराजांनी दिला मंत्र!

संसारात नैराश्य आले म्हणून जर परमार्थाची वाट धरत असाल तर दोन्ही तुमच्याकडून साध्य होणार नाही. संसारात राहून विषय, विकार, वासना संपवून जो परमार्थाची वाट चालतो तोच मोक्षाकडे जातो. म्हणून संतांनी आधी 'प्रपंच करावा नेटका' असे म्हटले आहे. त्यासाठी नवरा बायकोचे नाते यावर भाष्य करताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी मार्गदर्शन केले आहे. 

ते सांगतात, विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. त्यात नवरा बायकोच्या नात्याचा पूर्ण डोलारा विश्वासावरच अवलंबून असतो. विश्वासाला तडा गेला तर छोटीशी भेग दरी बनू लागते आणि त्याचे पर्यवसान घटस्फोटात होते. तसे होऊ नये म्हणून नवरा बायकोने दोन महत्त्वाच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत; कोणत्या ते जाणून घेऊ. 

पहिली गोष्ट म्हणजे प्रेम : 

नात्यात प्रेम असेल तर समोरच्या व्यक्तीला गुण दोषासकट स्वीकारण्याची मानसिकता आपोआप तयार होते. फक्त आई-वडील आणि मुलांच्या नात्यात उपजत प्रेम असते. नवरा बायकोच्या किंवा इतर कोणत्याही नात्यात सहवासाने, काळजीने, आपुलकीने प्रेम निर्माण करता येते. नवरा बायको या दोन वेगवेगळ्या वातावरणात घडलेल्या दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा एका छताखाली येतात तेव्हा सहवासाने प्रेम वाढते तसेच वादालाही अनेक विषय सापडतात. मात्र कोणत्याही वादात अहंकाराचा समावेश झाला तर प्रेमळ नात्याला सुरुंग लागतो आणि नाते दुभंगते. अशा वेळी नवरा बायकोने अहंकार महत्त्वाचा की नाते यावर सारासार विचार करून वेळीच माघार घ्यावी आणि वाद मिटवावेत. तसेच इतर कोणामुळे अविश्वास निर्माण होत असेल तर परस्परांशी बोलून संशय दूर करावा, त्यामुळे अकारण तेढ वाढत नाही. नाते अधिक दृढ होते. 

नवरा बायकोचे परस्परांवर निस्सीम प्रेम असेल तर शारीरिक, मानसिक, आर्थिक गरजा भागवण्यासाठी इतर कोणाची गरज वाटत नाही की व्यभिचारही करण्याची गरज भासत नाही. मात्र तसे नसेल तर, विश्वासघात होण्याची शक्यता बळावते किंवा कोणा एकाची घुसमट होत राहते. असे नाते वरकरणी एकत्र असले तरी त्या नात्याला अर्थ उरत नाही. प्रेमाची, सहानुभूतीची, स्पर्शाची गरज प्रत्येक जीवाला असते तर नवरा-बायकोला का नसणार? हीच गरज ओळखून परस्परांचा आदर करा आणि प्रेमाने नाते घट्ट बांधून ठेवा. 

जबाबदारीची जाणीव : 

सद्यस्थितीत विवाहबाह्य संबंध उघडपणे स्वीकारले जात आहेत. पण या संबंधातून शारीरिक आकर्षण संपले की फक्त मनःस्ताप वाट्याला येतो हे लक्षात ठेवा. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवी देह म्हटल्यावर वासना, विकार जडणारच! परंतु त्यावर विवेक बुद्धीने मात करणे हे आपल्या हातात आहे. इतर कोणाबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्याच वेळी मनावर घातलेले बंधन हे समीकरण जुळून आले तर नाते कधीही तुटणार नाही. विचार, वासना येत राहतात, त्याकडे दुर्लक्ष करा. एकमेकांवर निष्ठा ठेवा, मुलांचा विचार करा आणि बाह्य आकर्षणाला बळी पडू नका. आपण चुकीचे वागतोय, तसेच जोडीदाराने आपल्याला फसवले असते तर आपण ते सहन करू शकलो असतो का? या गोष्टींचा विचार करणे यालाच जबाबदारीची जाणीव असणे म्हणतात. 

नवरा बायकोने या दोन गोष्टींचे पालन केले तरी अर्ध्याहून अधिक कलह मिटतील. प्रश्न राहिला पैशांचा, तर पैसा, संपत्ती कष्टानेही मिळवता येईल, मात्र एकदा तुटलेले नाते, अनेक प्रयत्न केले तरी जोडले जाईलच असे नाही, म्हणून नात्यांचा आदर करा आणि जपा, आयुष्याच्या शेवटी तेच कामी येणार आहे!

Web Title: Vat Purnima 2025: Premanand Maharaj gave a mantra to keep the bond of love unbreakable along with the Vat Purnima fast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.