गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:39 IST2025-06-25T16:35:20+5:302025-06-25T16:39:43+5:30

Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj Punyatithi: वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते. टेंबे स्वामींनी रचलेल्या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला समृद्ध केले, असे म्हटले जाते.

shrimad vasudevanand saraswati tembe swami maharaj punyatithi 2025 know about datta avatar tembe swami charitra | गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj Punyatithi: एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्रख्यात वेदाभ्यासक म्हणून टेंबेस्वामींना ओळखले जाते. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते. दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी भाषेत विपुल साहित्य लेखन केले. गुरुवार, २६ जून २०२५ रोजी टेंबेस्वामी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने दत्तोपासक थोर विभूतीच्या अथांग चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

श्रावण वद्य पंचमीला म्हणजेच १३ ऑगस्ट १८५४ रोजी टेंबेस्वामी महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचे अध्ययन त्याने केले होते. श्री स्वामींच्या वास्तव्यामुळे माणगांव हे तीर्थक्षेत्र झाले. श्रीक्षेत्र माणगाव येथे श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी स्थापन केलेले श्रीदत्तमंदिर, हा त्या श्रीदेववाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे. सात वर्षे आपण माणगावमध्ये राहणार आहोत, ह्या शब्दांमध्ये श्रीदत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केले आणि माणगावात श्रीदत्तमंदिराची स्थापना करवली. माणगावचे श्रीदत्तमंदिर हे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचाच एक भाग आहे, अशी धारणा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांची होती, असे म्हटले जाते. 

स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला, गुरुचरित्राची अनेक पारायणे केली

त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. सात्त्विक वृत्ती, वेदोक्त आचार व संयम यांद्वारे टेंबेस्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला. टेंबेस्वामी महाराजांनी भारतात अखंड पदयात्रा करीत असत. फक्त चातुर्मासातच ते एके ठिकाणी राहत असत. अखंड प्रवासात त्यांनी श्री दत्त भक्तीचा प्रसार केला. स्वामींनी भारतभर भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या आणि गावागावांत प्रवचने दिली. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली आणि कठोर व्रते पार पाडली. श्रीपाद श्रीवल्लभ (दत्तात्रेयांचा पहिला अवतार) यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्र प्रदेश) आणि कर्मभूमी कुरवपूर, तसेच श्रीनृसिंह सरस्वती (दत्तात्रेयांचा दुसरा अवतार) यांचे जन्मस्थान कारंजा ही स्थाने शोधून भक्तांसाठी खुली केली. दत्त भक्तीचा शुद्ध प्रवाह प्रवाहित करण्यासाठी त्यांनी ज्ञान, भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचे समन्वय साधले.

अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना

टेंबेस्वामी प्रथम नरसोबाच्या वाडीस गेले. तेथे गोविंदस्वामी ह्या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना सुरू केली. त्यांना पुढे वारंवार दत्तात्रेयाचे साक्षात्कार होऊ लागले आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयानेच त्यांना मंत्रोपदेश दिला, असे सांगतात. त्यांनी तेथे योगाभ्यासही केला. १८८२ मध्ये त्यांनी चांद्रायण व्रत केले. पुढे माणगाव येथे त्यांनी दत्ताचे मंदिर उभारले आणि तेथेच मौनव्रताने राहू लागले. सात वर्षे त्यांनी अशी निग्रहपूर्वक दत्तोपासना केली. पुराण-प्रवचनांद्वारे लोकांत धर्मजागृती करीत. अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली. दत्तोपासनेचा प्रचार केला. या उपासनेला प्रेरक अशी विपुल ग्रंथरचनाही केली.  

‘दिगंबरा दिगंबरा..’ हा प्रभावी मंत्र देणारे थोर दत्तोपासक

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा विश्वशांतीमंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामी महाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी संस्कृत आणि मराठीत अनेक ग्रंथ रचले, ज्यामुळे दत्त संप्रदायाला तात्त्विक आणि साहित्यिक आधार मिळाला. त्यांचे साहित्य अद्वैत वेदांत आणि दत्त भक्ती यांचा समन्वय साधते. टेंबे स्वामींनी रचलेल्या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला समृद्ध केले. श्री दत्त माहात्म्य, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, दत्तभावसुधारस स्तोत्र, दत्तकाव्य (त्रिशती गुरुचरित्र), श्रीकृष्णालहरी, द्विसाहस्री गुरुचरित्र, श्रीसप्तशती गुरुचरित्र, दत्तचंपू, शिक्षात्रय, करुणात्रिपदी, दत्तलीलामृताब्धिसार: या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला तात्त्विक आधार दिला.

श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराज यांचे समकालीन

टेंबे स्वामी हे श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराज यांचे समकालीन होते. या सर्व संतांच्या चरित्रात टेंबे स्वामींचा उल्लेख आढळतो, असे म्हटले जाते. नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय. श्री कस्तुरे यांनी यतिश्वर परियात्रा या स्वामी महाराजांच्या चरित्रात एक स्वप्नदृष्टांत सांगितलेला आहे. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या स्वप्नात एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आले. त्यांनी जेव्हा दत्तप्रभूंना विचारणा केली की, हे कोण आहेत? तेव्हा दत्तप्रभूंनी उत्तर दिले की, ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असून ते म्हणजे माझाच दत्तावतार आहेत. हे लक्षात घेऊन तू त्यांच्या दर्शनाला जा. अर्थात दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला गेले व त्यांचे मन प्रसन्न झाले. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे आषाढ शुद्ध प्रतिपदेला सन १९१४ मध्ये समाधी घेतली.

 

Web Title: shrimad vasudevanand saraswati tembe swami maharaj punyatithi 2025 know about datta avatar tembe swami charitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.