गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: ब्रह्मज्ञानी, लाखोंचे श्रद्धास्थान, भक्तवत्सल गजानन बाबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:22 IST2025-02-19T11:22:21+5:302025-02-19T11:22:28+5:30

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. जाणून घ्या, गजानन महाराजांच्या दैवी चरित्राचा थोडक्यात आढावा...

shree gajanan maharaj prakat din 2025 know about shree gajanan maharaj charitra | गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: ब्रह्मज्ञानी, लाखोंचे श्रद्धास्थान, भक्तवत्सल गजानन बाबा!

गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: ब्रह्मज्ञानी, लाखोंचे श्रद्धास्थान, भक्तवत्सल गजानन बाबा!

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. महाराष्ट्रासह देश-विदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत. नित्यनेमाने भाविक सेवा करण्यासाठी जात असतात. यंदा गुरुवार, २० फेब्रुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने श्रींच्या दैवी चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 

गण गण गणात बोते हा सिद्धमंत्र देणारे भक्तवत्सल गजानन बाबा

'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहानमोठ्या गावातही जात. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. 

ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात

गजानन महाराजांना दांभिकतेची त्यांना चीड येत असे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले. गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने ते सेवन करीत. ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले, असे पदार्थ महाराज आवडीने खात असत.

अनेकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त केले

गजानन महाराज  कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. 

शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापनाचा शेगाव संस्थान आदर्श

गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.

।। अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।

।। श्री गजानन जय गजानन ।।

।। गण गण गणात बोते ।।

Web Title: shree gajanan maharaj prakat din 2025 know about shree gajanan maharaj charitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.