एप्रिल 'फूल' समझे क्या? फायर है ये; वाचा एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाववैशिष्ट्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:44 IST2022-03-31T16:44:22+5:302022-03-31T16:44:41+5:30
रसिक, सुंदर, मेहनती आणि जिद्दी ही ओळख आहे एप्रिल महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांची!

एप्रिल 'फूल' समझे क्या? फायर है ये; वाचा एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाववैशिष्ट्य!
तुमचा वाढदिवस एप्रिल महिन्यात आहे? ज्योतिषशास्त्र सांगते, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती दिसायला मोहक, आकर्षक, जिद्दी, मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला त्यांना चांगल्याप्रकारे अवगत असते. साहसी खेळात त्यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी असतो. घटकेत राग, घटकेत प्रेम. त्यामुळे समोरचा माणूस भांबवतो. तुम्ही कसेही वागलात तरी त्यांनी तुमच्याशी छानच वागावे, अशी तुमची अपेक्षा असते. परंतु, या व्यक्ती रंगात आल्या, की सभेचा आकर्षण बिंदू ठरतात. याचे कारण त्यांचा हजरजबाबीपणा आणि अलौकिक बुद्धीमत्ता!
ज्योतिषशास्त्राकडून रसिक अशी बिरुदावली मिळाली आहे, यावरून त्या लोकांचे प्रणयजीवन किती रंगीत असेल याची कल्पनाच केलेली बरी! सोळाव्या वर्षाचा टप्पा पूर्ण होता होताच यांचे प्रेमसंबंध सुरू होतात. एका वेळेस चार-पाच जणांवर भुरळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ असते आणि प्रत्येक प्रकरण ते लीलया सांभाळतात. चोरी पकडली गेली, तरी त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामुळे त्यांना शंभर गुन्हे माफ केले जातात. त्यांचे वैशिष्ट्य असे, हर तऱ्हेच्या नैतिक अनैतिक गोष्टी करूनही लग्नानंतर वैवाहिक जीवनात ते साळसूदपणाचा एवढा आव आणतात, की भूतकाळात त्यांच्याकडून काही `चूका' घडल्या आहेत, यावर जोडीदाराचाही विश्वास बसत नाही.
क्रिडा, प्रसार माध्यमे, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवे ते हट्टाने मिळवतात. यश त्यांचा सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील, त्यात यश संपादित करतात.
खर्चाच्या बाबतीत त्यांचा हात सढळ असतो. कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला, तर ती व्यक्ती त्यांच्या शत्रूयादीत जमा होते. त्यांचा राग न परवडणारा असतो. लोक त्यांना बाचकून असतात. परंतु त्यांच्या गोड हास्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पना येणेही कठीण जाते.
या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला, तर त्यांची खूप प्रगती होऊ शकेल. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. आपल्या रंग-रूपाबद्दल वृथा अभिमान न बाळगता दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर केला पाहिजे.
या महिन्यातील अनेक व्यक्तींनी प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. मुकेश अंबानी, सचीन तेंडुलकर, पं. रवि शंकर, अल्लू अर्जुन,कपिल शर्मा, राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी, जया बच्चन, अरजित सिंग, प्रभू देवा, अजय देवगण, इ.
शुभ रंग : नारंगी, सोनेरी
शुभ वार : रविवार, बुधवार, शुक्रवार
शुभ रत्न : माणिक
शुभ अंक : १,४,५,८