मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:28 IST2025-09-07T12:27:23+5:302025-09-07T12:28:22+5:30

Pitru Paksha 2025 Dates: मृत्यू पंचकात सुरू झालेला पितृपक्ष कधीपर्यंत आहे? या पितृ पंधरवड्यातील कोणत्या तिथी महत्त्वाच्या मानल्या जातात? जाणून घ्या...

pitru paksha 2025 in mrityu panchak these 7 tithis of pitru pandharwada have more importance and know significance of mahalayarambh | मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

Pitru Paksha 2025 Date: २०२५ मध्ये येणारा पितृ पंधरवडा अनेकार्थाने विशेष मानला जात आहे. पितृ पक्षाची सुरुवात खग्रास चंद्रग्रहणानंतर होणार आहे. तर मृत्यू पंचक सुरू असताना महालयारंभ होणार आहे. मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या चातुर्मास काळातील पितृ पंधवडा किंवा पितृ पक्षाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये विशेष महत्त्व आहे. यंदा ०८ सप्टेंबर २०२५ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पितृपक्ष आहे. या पितृ पंधरवड्यात काही तिथी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. जाणून घेऊया...

भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार, चार ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध'. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते, असे म्हटले जाते.

पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता 

'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते, अशी मान्यता आहे. 

२०२५ मध्ये पितृपक्षात कोणत्या तिथी महत्त्वाच्या आहेत?

- ८ सप्टेंबर २०२५ रोजी महालयारंभ होत असून, प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे, असे सांगितले जात आहे. या दिवशी ग्रहण करिदिन आहे. 

- अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे, त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण, पूजन केले जाते.

- भाद्रपद वद्य तृतीय १० सप्टेंबर रोजी असून, या दिवशी तृतीया श्राद्ध करावे. या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. तसेच याच दिवशी चतुर्थी श्राद्ध करायचे आहे. 

- सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते. त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात. यंदा ११ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे. 

- भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते. या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना (सवाष्ण) मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते. यंदा १५ सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून, या दिवशी नवमी श्राद्ध करावे.

- भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. याचे फलस्वरुप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. यंदा १७ सप्टेंबर २०२५ रोजी इंदिरा एकादशी असून, या दिवशी एकादशी श्राद्ध आहे.

- भाद्रपद द्वादशीला दिवंगत सन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. यंदा १८ सप्टेंबर २०२५ रोजी द्वादशी श्राद्ध करावे.

- १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदोष, शिवरात्रि आहे. या दिवशी त्रयोदशी श्राद्ध तसेच मघा श्राद्ध आहे.

- भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात, विष, शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. २० सप्टेंबर २०२५ रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे.

- २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. भाद्रपद अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हणूनही संबोधले जाते. अमावास्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल, अशा सर्वांनी सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. 

- महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे.

 

Web Title: pitru paksha 2025 in mrityu panchak these 7 tithis of pitru pandharwada have more importance and know significance of mahalayarambh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.