सर्वपित्री अमावास्या: श्राद्ध, तर्पण विधी कसा कराल? पाहा, सोपी पद्धत, पूर्वज होतील प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:39 PM2023-10-11T15:39:54+5:302023-10-11T15:40:11+5:30

Sarvapitri Amavasya 2023: वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, तरी केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.

pitru paksha 2023 know about shradh tarpan vidhi and significance of sarvapitri amavasya 2023 | सर्वपित्री अमावास्या: श्राद्ध, तर्पण विधी कसा कराल? पाहा, सोपी पद्धत, पूर्वज होतील प्रसन्न!

सर्वपित्री अमावास्या: श्राद्ध, तर्पण विधी कसा कराल? पाहा, सोपी पद्धत, पूर्वज होतील प्रसन्न!

Sarvapitri Amavasya 2023:पितृपक्ष सुरू असून, सर्वपित्री अमावास्या ही पितृ पंधरवड्याची सांगता असते. १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. विशेष म्हणजे भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण लागणार आहे. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात. सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान, तर्पण विधी करतात.

पूर्वजांच्या कृपाशिर्वादामुळे वारसांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे मानले जाते. या पितृपक्ष पंधरवड्यात पृथ्वीतलावर आलेले पूर्वज वारसांकडून अन्न, जल ग्रहण करून सर्वपित्री अमावास्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात, अशी मान्यता आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, रुढी आणि काही नियमांचे पालन करावे लागते, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. 

श्राद्ध कार्य विधी

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजचे तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर, वारसांवर कृपादृष्टी व शुभाशिर्वाद कायम राहावेत, अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमायाचना करावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परतरण्याची विनंती पूर्वजांना करावी, असे सांगितले जाते. 

पूर्वजांच्या नावाने एक पान अन् काकबळी

सर्वपित्री अमावास्येला घरातील महिला वर्गाने सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वज्यांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते.

सर्वपित्रीला पूर्वजांचे श्राद्ध कार्य महत्त्वाचे

पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही वा करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.

दरम्यान, श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे. सर्वपित्री अमावास्येला कोणाचाही अपमान करू नये. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा. कोणत्याही पशु-पक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रस्त करू नये. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते.

- सदर मान्यता आणि दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: pitru paksha 2023 know about shradh tarpan vidhi and significance of sarvapitri amavasya 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.