Navratri 2025: नऊ दिवसांचे पारणे जो पूर्ण करतो, त्यावर होते देवी सिद्धिदात्रीची कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:00 IST2025-10-01T07:00:00+5:302025-10-01T07:00:02+5:30
Navratri 2025: नवरात्रीत देवीच्या रूपाची, गुणाची उपासना करून तिचे गुण अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी ही मानसपूजा

Navratri 2025: नऊ दिवसांचे पारणे जो पूर्ण करतो, त्यावर होते देवी सिद्धिदात्रीची कृपा!
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसरैरमरैरपि
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।
आई भगवतीचे नवरात्रीतले नववे आणि शेवटचे रूप सिद्धिदात्रीचे आहे. ही देवी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी आहे. मार्कंडेय पुरणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्रकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत. ब्रह्मवैवर्तपुराणातील श्रीकृष्णजन्म खंडात सिद्धिंची संख्या अठरा असल्याचे नमूद केले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
अणिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, महिमा, ईशित्व/ वशित्व, सर्वकामावसायिता, सर्वज्ञत्व, दूरश्रवण, परकायप्रवेशन, वाकसिद्धी , कल्पवृक्षत्व, सृष्टि, संहारकरणसामथ्र्य, अमरत्व, सर्वन्यायकत्व, भावना, सिद्धी!
आई सिद्धिदात्री भक्तांना आणि साधकांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करू शकते. देवीपुराणात तर असे म्हटले आहे, की खुद्द भगवान शंकरांनीदेखील देवीकडून सर्व सिद्धी प्राप्त केल्या आहेत. या कारणाने, शिव शंकराचे अर्ध शरीर देवीचेझाले. म्हणून ते `अर्धनारीनटेश्वर' म्हटले जाऊ लागले.
माता सिद्धिदात्रीला चार हात आहेत. एका हातात शंख, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात कमळ, चौथ्या हातात गदा आहे. कमलासनावर देवी विराजमान झाली आहे. तसेच सिंहाला तिने आपले वाहन म्हणून निवडले आहे.
देवी नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. देवीची शास्त्रोक्त पूजा करणारा साधक सर्व सिद्धिप्राप्तीसाठी लायक ठरतो. त्याच्यासाठी पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अगम्य राहत नाही. `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले' अशी भक्ताची उन्मनी अवस्था होते.
आपण आपल्या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्नशील असतो, त्याप्रमाणे आपल्या कार्याला परिपूर्णता मिळावी, म्हणून सिद्धिदात्रीला सर्वांनीच शरण गेले पाहिजे. देवीच्या कृपेने आपली संसारातील आस्था कमी होऊन मन अलिप्त होत जात़े सुख-दुु:ख पचवण्याची क्षमता वाढते आणि आपसुकच मोक्षाची दारे भक्तांसाठी खुली होतात.
नवदुर्गांमधील सिद्धिदात्री ही शेवटची देवी आहे. अन्य आठ दुर्गांची यथासांग पूजा करून नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीला शरण जायचे असते. देवीच्या उपासनेमुळे लौकिक-परलौकिक इच्छांची पूर्ती होते. साधक संसारतापातून मुक्त होऊन पारमार्थिक आनंदाचा अनुभव घेतो. ब्रह्मांडातील शक्ती, परलोक या विषयात रममाण होऊन चिरंतन सुखाचा अधिकारी बनतो. देवीचे सान्निध्य हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय बनते.
मन:शांतीच्या शोधात मनुष्य फिरत राहतो, त्याऐवजी त्याने मनोभावे, आईला साद दिली, तर ती प्रतिसाद नक्कीच देईल. देवीचा आशीर्वाद सर्व भक्तांवर कायम राहो आणि हाती घेतलेल्या सर्व कार्यात सिद्धी प्राप्त होवो, हीच देवी सिद्धिदात्रीकडे आणि समस्त नवदुर्गांच्या चरणी प्रार्थना!
शुभं भवतु. जगदंऽऽब उदयोस्तु!