Magh Maas 2026: माघात लग्नकार्याची पुनश्च सुरुवात, गणेश जयंती, महाशिवरात्रीसारख्या उत्सवांची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 07:05 IST2026-01-19T07:00:01+5:302026-01-19T07:05:02+5:30
Magh Maas 2026: यंदा सोमवार १९ जानेवारी पासून माघ मास सुरु होत आहे, या महिन्याचे वैशिष्ट्य, सण, उत्सव आणि महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ.

Magh Maas 2026: माघात लग्नकार्याची पुनश्च सुरुवात, गणेश जयंती, महाशिवरात्रीसारख्या उत्सवांची बरसात
भारतीय कालगाणनेत प्रत्येक महिन्याचे एक वेगळेपण आहे, परंतु 'माघ' महिन्याची सर कशालाच नाही. ज्या महिन्याच्या पौर्णिमेला 'मघा' नक्षत्र येते, तो हा माघ मास. प्राचीन काळी याला 'तप' असेही संबोधले जात असे. कडाक्याच्या थंडीतून हळूहळू उबदार वसंताकडे नेणारा आणि मनाला भक्तीच्या रंगात न्हाऊ घालणारा हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. तसेच या महिन्यात पौषामुळे खोळंबलेली लग्न कार्य पुन्हा सुरू होतात.
शिव-गणेश आणि पिता-पुत्रांचा महिमा
माघ महिना हा शिवभक्त आणि गणेशभक्तांसाठी पर्वणीच असतो.
गणेश जयंती: माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने 'महोत्कट विनायक' रूपात अवतार घेतला, जो गणेशभक्तांसाठी मोठा उत्सव असतो. यंदा २२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेशोत्सव आहे.
महाशिवरात्री: याच महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला देवाधिदेव महादेवाची 'महाशिवरात्री' येते. पिता-पुत्रांच्या या अद्वैतामुळे माघ महिना भक्तीने दरवळून निघतो. यंदा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्र आहे.
Palmistry: ज्यांच्या तळहातावर 'X' ही खूण असते, त्यांना आधीच कळतात भविष्यातील घटना!
सूर्योपासना आणि भीष्म अष्टमी
रथसप्तमी: माघ शुद्ध सप्तमी ही सूर्योपासकांसाठी महत्त्वाची. सूर्याच्या रथाला सात घोडे जुंपले गेलेली ही तिथी आरोग्याची आणि तेजाची देवता असलेल्या सूर्याची आराधना करण्याची संधी देते.
भीष्म अष्टमी: रथासप्तमीच्या दुसऱ्या दिवशी येते ती भीष्म अष्टमी. पितामह भीष्मांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्राद्धकर्म करून भारतीय संस्कृतीतील 'आदर' आणि 'कृतज्ञता' हा हृदयंगम पैलू जगासमोर मांडला जातो.
दासनवमी आणि समर्थ संप्रदाय
समर्थ रामदास स्वामींच्या स्मृती जागवणारी 'दासनवमी' याच माघ महिन्यात येते. समर्थ भक्तांसाठी आणि सांप्रदायिकांसाठी हा दिवस आत्मचिंतनाचा आणि दासबोधातील विचारांच्या जागरणाचा असतो.
Tarot Card: 'कुछ खट्टा, कुछ मीठा' याची अनुभूती देणारा आठवडा; निवडा एक कार्ड, वाचा साप्ताहिक भविष्य!
वसंताचे आगमन आणि निसर्ग बदल
माघ महिन्यातच ऋतूराज वसंताचे आगमन होते. शिशिराची पानगळती संपवून सृष्टी नवा साज ल्यायला सुरुवात करते.
कोकिळेचे कूजन कानावर पडू लागते.
झाडांना नवी पालवी फुटते आणि निसर्गाचे रूप पालटते.
याच काळात वसंत व्याख्यानमाला आणि संगीत महोत्सवांचे आयोजन करून रसिकजनांना वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानी दिली जाते.
दानाचे महत्त्व आणि सामाजिक ऋण
आपल्या संस्कृतीने माघ महिन्यात दानाला विशेष महत्त्व दिले आहे. आपल्या उत्पन्नाचा काही भाग (दशांश) समाजासाठी खर्च करावा, हा संस्कार या निमित्ताने रुजवला जातो. "आपण समाजाचे देणे लागतो" ही भावना व्रत-वैकल्यांच्या माध्यमातून अधिक दृढ होते.
पौष महिन्यातील निर्बंध संपून साखरपुडा, मुंज आणि गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च नवचैतन्य मिळते.