Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:21 IST2025-06-18T12:18:52+5:302025-06-18T12:21:55+5:30
Life Lesson: संकटं कोणालाही नको असतात, साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते, तरी अवघड वळणं का येतात? वाचा...

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
एखाद्या मोठ्या, गुळगुळीत आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंदादायी होतो. मात्र तिथेही स्पीडब्रेकर असतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे, पण खाच खळगे, खड्डे, खडबडीत अरुंद रस्ते, ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो. हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो 'रेड, ऑरेंज, ग्रीन पॅच' दाखवतात. यावरून आपण पुढच्या रस्त्याचा अंदाज घेतो. पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही. आपले इप्सित ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे...
प्रेमानंद महाराज दुःख, संकटं, मनःस्ताप, मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खाच-खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात, ही सुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना आहे. ते आलेच नाहीत तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही. त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही.
अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, काच दोन प्रकारची असते, एक जी दगड मारला तरी फुटते, दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही, तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो. ती ही काचच, तरी ती कणखर कशी झाली? तर आगीत तापवून, त्यावर थंड पाण्याचा मारा करून, परत आगीत तापवून, पाण्याचा मारा करून ती कणखर बनली. भगवंतदेखील आपल्याला सुख-दुःखाचा ससेमीरा पाठीशी लावून कणखर बनवतो. जेणेकरून आपल्याला सुख दुःख पचवण्याची ताकद मिळेल.
म्हणून सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक काही गडबड, गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका, सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे आहेत, असे समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा, तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले इप्सित ध्येय अर्थात आपला शेवट सुखकर होईल.