गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 07:07 IST2026-02-02T07:07:07+5:302026-02-02T07:07:07+5:30
Guru Pratipada 2026: श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते.

गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता…
Guru Pratipada 2026: तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ गुरुची महती वर्णावी तेवढी थोडीच असते. मराठी वर्षातील माघ महिना सुरू आहे. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रते, सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा. ही तिथी गुरुप्रतिपदा म्हणून ओळखली जाते. या तिथीचे महत्त्व, महात्म्य आणि मान्यता जाणून घेऊया...
ब्रह्मांडनायक असलेल्या दत्तगुरुंचे अनेक अवतार, अंशावतार झाले. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते. यंदा, ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुप्रतिपदा तिथी आहे.
श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव
श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या, असे सांगितले जाते.
श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे गाणगापुरी चोवीस वर्षे वास्तव्य
शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील दत्तगुरुंनी श्रीनृसिंह सरस्वती यांच्या स्वरुपात आपला दुसरा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते चोवीस वर्षे राहिले.
निर्गुण पादुका, विमल पादुका, मनोहर पादुका
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून अवतारकार्य संपवले. नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या 'विमल पादुका ' स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, याची माहिती कोणालाच नाही. विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. औदुंबर येथे नृसिंहसरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणाऱ्या पादुका.
श्रीनृसिंह सरस्वती श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. श्रीनृसिंह सरस्वती गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून माघ वद्य प्रतिपदा या तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.
श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे भक्तांना कालातीत अभयवचन
देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे. भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही. इ. स. १४५८ मध्ये श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की, ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते.
॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥