Gudi Padwa 2025: गुढी पाडव्यापासून महिनाभर केले जाते एकभुक्त व्रत; काय आहेत त्याचे फायदे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:27 IST2025-03-25T13:26:24+5:302025-03-25T13:27:21+5:30
Gudi Padwa 2025: सध्या 'वन मिल अ डे' या नावाने प्रचलित झालेली आहारशैली आपल्या पूर्वजांनी एकभुक्त व्रत या नावे कधीच योजून ठेवली आहे, त्याबद्दल जाणून घेऊ.

Gudi Padwa 2025: गुढी पाडव्यापासून महिनाभर केले जाते एकभुक्त व्रत; काय आहेत त्याचे फायदे? वाचा!
गुढीपाडव्यापासून हिंदू नवे वर्ष सुरू होते. यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा(Gudi Padwa 2025) आहे. या सणाबरोबर अनेक व्रत वैकल्य सुरू होतात. याच मुहूर्तावर आणखी एक व्रत केले जाते, ते म्हणजे एकभुक्त व्रत. आजच्या काळात त्याला 'वन मिल अ डे' अशी ओळख मिळाली आहे. मात्र आपल्या पूर्वजांनी या व्रताची सुरुवात का व कशासाठी केली? त्याचे लाभ काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे. ह्या महिन्याभराच्या काळात व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. एकभुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा. या व्रतादरम्यान हिंसा भाव मनात नसावा. शक्य तेव्हा 'ओम नमो वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. काही मंडळी महिनाभर ऐवजी वर्षभर हे व्रत करतात. मात्र एक महिनाभर व्रतस्थ राहून या व्रताचे पालन केल्यानेही तेवढाच लाभ होतो.
Health Tips: रक्तदाब, मधुमेह होऊच नये यासाठी 'हा' एक बदल करा; आठवड्याभरात फरक दिसेल!
हे व्रत का करावे?
आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार करायला हरकत नाही जेवणाचे प्रमाण ठरवून दिलेले असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे असल्याने पचनसंस्थेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेही उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचन संस्था ही थोडी कमकुवत होते. अशा वेळी आहार थोडा कमीच जातो. त्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवलेला आहे. हे व्रत आरोग्याशी निगडित असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती होवो न होवो, सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकेल.
Gudi Padwa 2025: हिंदू नवे वर्ष तुमच्या राशीला आर्थिक भरभराट देणार की काळजीत टाकणार? तुम्हीच बघा!
मनावर नियंत्रण :
'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत केले जाते. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते.
प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:
सतत काही ना काही खाण्याच्या सवयीमुळे अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि शरीराला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते.
जाणिजे यज्ञकर्म :
जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल.
पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :
सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.
Gudi Padwa 2025: चैत्र नवरात्रीत 'हे' उपाय करा; धन-धान्य, सुख-संपत्ती येईल घरा!