मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी २०२६: व्रत करा अन् बाप्पाचे आभार माना; पाहा, पूजा विधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:05 IST2026-02-20T13:53:50+5:302026-02-20T14:05:39+5:30
Falgun Vinayak Chaturthi February 2026: मराठी वर्षाचा शेवटचा फाल्गुन मास सुरू झाला आहे. या महिन्यातील विनायक चतुर्थी कशी साजरी करावी? जाणून घ्या...

मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी २०२६: व्रत करा अन् बाप्पाचे आभार माना; पाहा, पूजा विधी
Falgun Vianayak Chaturthi February 2026: अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः। सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः॥ मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू झाला आहे. फाल्गुन मासात विविध सण, व्रते केली जातात. याच फाल्गुन महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत आहे. गणेश व्रतांमध्ये विनायक चतुर्थीचे व्रत शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे. मराठी वर्षातील ही शेवटची फाल्गुन विनायक चतुर्थी असल्यामुळे आवर्जून व्रत करावे आणि वर्षभरात बाप्पाने आपल्यावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत आवर्जून केले जाते. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. फाल्गुन विनायक चतुर्थीचा सोपा व्रत विधी घरच्या घरी केला जाऊ शकतो. शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन विनायक चतुर्थी आहे.
फाल्गुन विनायक चतुर्थीचे गणपती पूजन
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करावी. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपती बाप्पाची स्थापना करावी. गणेशाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा.
दुर्वांची जुडी अन् जास्वंदाचे फूल वाहावे
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत. अनेकदा मनात इच्छा असूनही व्रत पूजन करता येतेच असे नाही. अशावेळेस गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात. सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥