स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:31 IST2025-08-13T15:29:37+5:302025-08-13T15:31:38+5:30
Shree Swami Samarth Maharaj: स्वामी सेवा केल्यावर स्वामींची कृपा झाली आहे, हे कसे ओळखावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
Shree Swami Samarth Maharaj: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. ते कृपासागर आहेत. अशा स्वामींची अनेक जण न चुकता, नियमितपणे सेवा करत असतात.
अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा, सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्रांचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा, असे वाटत असते. परंतु, स्वामी सेवा केल्यावर स्वामींची कृपा झाली आहे, हे कसे ओळखावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही अनुभव आले, तर स्वामीकृपा नक्की झाली, असे समजावे, असे सांगितले जाते.
या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट फार दूर नाही
मुळात स्वामींची सेवा करावी, हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते. आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागते. तरच संत चरण लाभते. सेवा करायची आहे, एकदा का हा विचार मनात रुजला की, समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे ही तर खरच कसोटी आहे. हम गया नही जिंदा हैं... याची प्रचिती क्षणोक्षणी आहे.
ओंजळ रिती राहणार नाही, इतके भरभरून स्वामी देणारच आहेत, पण...
कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही, इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच. परंतु, त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे. सक्षम व्हायला हवे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज मला भेटत आहेत. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
आपल्यात अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते
नामस्मरण सुरू झाले की आपल्यातील दोष स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्यात अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते. देह सर्वत्र आणि आत्मा मन त्यांच्या चरणी अशी अवस्था प्राप्त होते. आपल्यातील अहंकार लोप पावू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते, घेणे मागणे अपोआप कमी होत जाते. तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची ते तेच ठरवतील नव्हे तो त्यांचाच अधिकार आहे. त्यांचा सहवास लाभणे , चांगले विचार मनात रुजणे, दुसऱ्याला मदत करायची बुद्धी होणे, सतत दुसऱ्याचा तिरस्कार , मत्सर ह्यातून निर्माण होतात ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परावृत्त होणे, ह्यासाठी मनापासून अंतर्मुख झालात तर तुमची आभाळाइतक्या चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील. ज्या महाराजांच्या चरणाशी त्यांच्या सान्निध्यात आनंद आहे, परमोच्च सुख आहे, तिथे नको जायला आपल्याला. शेवटी ती शोधत आपण तिथेच पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे.
आशेला नवीन पालवी फुटेल
सर्व काही जे-जे केले आहे मग ते चांगले वाईट काहीही असो , केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी घ्यावी. कुणाला दुखावले असेल त्यांची माफी मागावी. तरच महाराज सुद्धा माफ करतील. त्यांच्या चरणी आपला प्रपंच वाहा. बुद्धी देणारे तेच आहेत, करते आणि करवते सुद्धा! दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण ज्याने आपले जीवन कात टाकल्यासारखे बदलून जाईल. आनंदाला बहार येईल आणि आशेला नवीन पालवी फुटेल. जीवन घडवण्यासाठी मिळालेली ही सुवर्णसंधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणे निव्वळ आपल्याच हाती आहे.