Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:58 IST2025-07-22T15:57:27+5:302025-07-22T15:58:19+5:30

Ashadha Amavasya Puja 2025: आपल्या चैनीसाठी वा देहाचे चोचले पुरवण्यासाठी संस्कृती, धर्माचा गैरवापर न करता या सणांचे मूळ स्वरूप काय आहे ते समजून घेऊ.

Deep Amavasya 2025: Ashadh Amavasya is called the auspicious day of lights, not the Gatari; Dharmashastra says... | Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

दिनदर्शिके केशरी रंगाने भरलेल्या रकान्यांचे दर्शन घडले, की मनाला उभारी येते. कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाचे, व्रत वैकल्याचे, आनंद-उत्सवाचे ते चिन्ह असते. अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे, ती म्हणजे 'दीप अमावस्या.' तिलाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. मात्र काही समाजकंटंकांनी तिला 'गटारी' अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावला आहे. यंदा दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) २४ जुलै रोजी आहे, यंनिमित्ताने दीप अमावस्येचे धर्मशास्राने अधोरेखित केलेले महत्त्व जाणून घेऊ!

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...

श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे सबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात. सणाचे पावित्र्य राखावे, यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की महिनाभर जे खायचं - प्यायचं नाही, ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं! अशातच यंदा अधिक श्रावण मास आल्याने दोन महिने तरी व्रतस्थ राहावे लागणार आहे. कारण अधिक श्रावण मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, जो भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे पथ्य पाळा, त्याचे चांगले फळ मिळेल हेही नक्की!

Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!

डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एकवेळ जेवा असे सांगतात, त्याचा अर्थ असतो आहारावर नियंत्रण आणा. मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू, तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय? हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे. 

घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते, परंतु मद्यपींना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते. ते आनंद झाला म्हणून पितात, दु:खं झाले म्हणूनही पितात. अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचे, म्हणजे महिन्याभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयते निमित्त चालून आल्यासारखे आहे. अशा मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला 'गटारी' घोषित करून शब्दश: गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवला आहे. 

मात्र, हे असे वागणे म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखे आहे. आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते. आषाढ अमावस्येला (Aashadh Amavasya 2025) चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले? श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते. हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे, की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते, तेव्हा उदास न होता पणतीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा, तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल.

अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारले की, ' यंदा गटारीला काय विशेष?' तर त्यांना खडसावून सांगा, 'त्या दिवशी दिव्यांची आवस (Deep Amavasya 2025)आहे, गटारी नव्हे!' या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्याचे तेज आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते. 

Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!

अशा रीतीने आपण आपल्या धर्माची, परंपरांची, नीती मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आज आपण जे वागणार आहोत, त्याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे. त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे. शेवटी म्हणतात ना, 'धर्मो रक्षति रक्षित:' अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो! चला तर, आपणही धर्मरक्षक बनुया!

Web Title: Deep Amavasya 2025: Ashadh Amavasya is called the auspicious day of lights, not the Gatari; Dharmashastra says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.