>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
गुण मिलनासाठी येणाऱ्या पत्रिका ह्या अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहाव्या लागतात. अनेकदा लोकांना निर्णय ऐकण्याची इतकी घाई असते, की जसे काही गुणमिलन व्यवस्थित आहे पुढे जाण्यास हरकत नाही हे ऐकून लगेच दुसऱ्या दिवशी लग्न लावणार आहेत असाच थाट असतो! इतक्या महत्वाच्या गोष्टीला घाई करून चालणारच नाही, कारण ही लग्नगाठ आयुष्यभराची असते.
मध्यंतरी एक पत्रिका पहिली. शुक्राची दशा आणि विवाहाचा प्रश्न. शुक्र सप्तमेश आणि व्ययेश केतूच्या मूळ नक्षत्रात. शुक्र आणि मंगळ युती तीही अंशात्मक दिसताना धनेत द्वितीय भावात, पण फळे देणार लग्नाची. केतू काही कला आणि विकलांवर षष्ठ भावात. वरवर पाहता कृष्णमुर्ती प्रमाणे हा केतू पंचमाची फळे देईल असे वाटले, पण केतूने पंचम भावाला स्पर्शसुद्धा केलेला नाही, त्यामुळे तो पंचम भावाची फळे न देता षष्ठ भावाचीच फळे देणार. ह्याचा अर्थ शुक्र हा ७, १२ असून षष्ठ भाव पण देणार. म्हणजेच ६, १२ ची नकारात्मक फळे शुक्राच्या दशेत मिळणार. वैवाहिक सुखाचा दूरदूर पत्ता नसलेली ही ग्रहस्थिती आहे.
माणूस समजून किती घेऊ शकेल ह्याची परीक्षा पाहणारी ग्रहस्थिती, जी अत्यंत फसवीसुद्धा आहे. वैवाहिक सुखाचा कारक ग्रह केतू ह्या विरक्ती देणाऱ्या नक्षत्रात आणि पुन्हा षष्ठात. शुक्राची दशा थोडी थोडकी नाही तर २० वर्षाची आहे. त्यात लग्न वृश्चिक आणि त्यात चंद्रासोबत बुध व अनेक ग्रहांची भाऊगर्दी. प्रचंड आतल्या गाठीचे हे व्यक्तिमत्व. अशा पत्रिका चक्रावून टाकणाऱ्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या असतात. पण समोरच्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्यामुळे उत्तर कसेही असो, प्रामाणिक पणे द्यावेच लागते. पुढे त्यांची इच्छा. ह्या केसमध्ये समोरच्या यजमानांनी मला सांगितले की अजून कुणी त्यांना सांगितले की उत्तम आहे सर्व. मनातल्या मनात मी डोक्याला हात लावला. म्हटले आपल्या मनाचा कौल घ्या, परमेश्वर तुम्हाला योग्य विचारशक्ती देवो. ह्यापलीकडे निदान माझ्या हातात काहीही नाही. शेवटी जसे घडायचे तशी बुद्धी होणारच!
आता ह्या शुक्राला केतूच्या मूळ नक्षत्रातून उचलून शुक्राच्या पूर्वा नक्षत्रात आणणे हे ब्रम्हदेवालाही कदाचित जमणार नाही. आहे हे असे आहे, कारण ते आपले प्राक्तन आहे. हे असेच्या असे राहणार पुढील २० वर्ष. दशा स्वामी ६ आणि १२ व्या स्थानाची फळे देत असेल तर कशी काय जुळवायची सोयरिक? आता ह्यात गोम अशी आहे, की वरवर पाहता हा केतू पंचम भावाची फळे देत आहे असे दिसते, पण तसे नाही आणि हेच जर नेमके ज्योतिषाला समजले नाही तर तो सांगेल वा वा पंचम भावाची फळे मिळतील, विवाह करायला हरकत नाही, पुढे मुले वगैरे पण होतील. मात्र मुले सोडा, विवाह होईल की नाही शंका आहे आणि विवाह झालाच तर टिकेल का? कारण अशा लोकांना अनेकदा चुकीचेच मार्गदर्शन मिळते ( पुन्हा त्यांचे प्राक्तन). वैवाहिक सौख्य मिळेल का? म्हणूनच घटना घडवण्याचा सर्वस्वी अधिकार दशा स्वामीने राखून ठेवली आहे, तो आम्हाला हवे तसे उत्तर देण्यास अजिबात बांधील नाही. दशा अत्यंत महत्वाची आहे, तिला डावलून आपण काहीही करू शकणार नाही.
जर एखाद्या व्यक्तीने ओढून ताणून आणि अर्धवट ज्ञानाने जुळलेल्या पत्रिकेच्या व्यक्तीशी विवाह केलाच तर पदरात घोर निराशा आणि काडीमोड ह्याखेरीज दुसरे काहीही पडणार नाही. कृष्ण्मुर्तीचा सखोल अभ्यास असे बारकावे दर्शवतो, जे अचूक उत्तरापर्यंत नेते. तात्पर्य, ग्रह समजले नाही तर निदान चुकेल, जे बहुतांश पत्रिकेत आजकाल पाहायला मिळते. म्हणूनच कदाचित पुढे जाऊन वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात. ग्रह त्याचे नक्षत्र, दशा स्वामी कुठल्या नक्षत्रात आहे आणि तो कुठले भाव दर्शवत आहे, विवाहाचा कारक शुक्र कुठल्या नक्षत्रात आहे, ह्या सर्व ग्रहस्थितीची सांगड दशेशीही करावी लागते. ह्यात कुठेतरी लहानशी उणीव राहिली तर उत्तर चुकू शकते. म्हणून, मुला मुलींच्या पालकांनासुद्धा नम्र विनंती करावीशी वाटते. सोयरिक जुळवताना ज्योतिषाच्या मागे तगादा लावू नका, त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ द्या त्यात तुमचेच भले आहे. ज्योतिष बाजूला ठेवा. आपल्यालाही कान, नाक, डोळे आहेत. प्रत्येक माणसालाही आंतरिक विचारशक्ती( sixth sense) असतो. मुलगा किंवा मुलगी बोलते कशी, तिचे विचार, नम्र की उद्धट, मानसिकता, आर्थिक बाबतीत असणारे विचार ह्याची उत्तरे तुम्ही अचूक प्रश्नांच्या माध्यमातून नक्कीच मिळवू शकता. नुसते दिसणे आणि हसणे महत्त्वाचे नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक चढ आणि उतारावर त्यांचे सोबत असणे अनमोल ठरेल.
प्रत्येक ग्रह त्याची राशीपरत्वे बैठक, नक्षत्र आणि दशा ह्याची योग्य सांगड अचूक निर्णय देण्यास समर्थ असतात. ह्या सर्वात कमी म्हणून अनेक ग्रह वृश्चिकेत असतील तर तेही तपासावेच लागतात. संसारात मोकळे ढाकळे असावे. वागण्या बोलण्यात मोकळेपणा, प्रेम, समजूतदारपणा अशा असंख्य गोष्टीवर संसाराची इमारत असते. त्या दोघांना आयुष्य एकत्र काढायचे आहे, त्यांच्या नात्यात गोडवा असावा आणि तो वृद्धिंगत व्हावा. तिथे गूढ गूढ काहीच नसावे. आकाश मोकळे निरभ्र असावे. सहमत?
संपर्क : 8104639230