Astro Tips: ओटी भरताना इतर कोणतेही फळ चालते, पण केळं नाही; असे का? जाणून घ्या शास्त्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:01 IST2025-05-08T12:59:58+5:302025-05-08T13:01:03+5:30
Astro Tips: सुवासिनीची ओटी भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे, त्यात खणा-नारळाबरोबर कोणतेही फळ द्यावे पण केळं देऊ नये; का ते जाणून घेऊ!

Astro Tips: ओटी भरताना इतर कोणतेही फळ चालते, पण केळं नाही; असे का? जाणून घ्या शास्त्र!
पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. अशा वेळी खण (ब्लाउजपीस), नारळ, तांदूळ, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, पैसे आणि फळ दिले जाते. मात्र त्यात केळ्याचा समावेश का नसतो ते जाणून घेऊ. त्याआधी ओटी का भरली जाते तेही जाणून घेऊ.
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
ओटी का भरतात?
अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, 'ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटी-पोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. (म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही.) स्त्रीजीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिचा ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते.
मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतीकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल, तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. पाच सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संततीप्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतीकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाजजीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते.
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
ओटीमध्ये केळी न देण्याचे कारण...
ज्योतिष अभ्यासक आनंद पिंपळकर सांगतात, 'महाराष्ट्रातच नाही तर भारतात सर्वत्रच ओटी भरताना केळी दिली जात नाहीत. कारण केळ्याच्या झाडाला एकदाच केळ्यांचा घड लागतो. मात्र पुन्हा केळी येत नाहीत. आलीच तरी ती चांगल्या प्रतीची नसतात. ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणे निषिद्ध मानले जाते. पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतेही फळ द्यावे पण केळं देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला.