आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:11 IST2025-06-17T17:10:05+5:302025-06-17T17:11:12+5:30
Pandharpur Ashadhi Wari 2025 Special Trains: आषाढी वारीसाठी रेल्वेकडून पंढरपूरसाठी ८० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
Ashadhi Ekadashi 2025: वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की, सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात. संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिद्धी आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी येतात. उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून ८० विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी ८० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची ही सेवा असणार आहे. पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून या ट्रेनची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वारीसाठी, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या मार्गांवर चालवल्या जाणार विशेष सेवा?
पुणे-मिरज, नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, लातूर-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज-कलबुर्गी, कोल्हापूर-कुर्डूवाडी अशा ८० पेक्षा अधिक आषाढी विशेष फेऱ्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे रेल्वे प्रशासनाने असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. तसेच राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला असून त्याचा शासन आदेशही निघाला आहे.
दरम्यान, १८ जून २०२५ रोजी जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून १९ जून २०२५ रोजी प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच अन्य मानाच्या पालख्यांचे प्रस्थानही होत आहे.