‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:32 IST2019-02-07T00:32:12+5:302019-02-07T00:32:43+5:30
पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’
अंबाजोगाई : पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
येथील मानवलोक येथे राजेंद्र राणा यांच्या दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसेच राष्ट्रीय पाणी परिषदेचे उद्घाटन राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशदाचे डॉ. सुमंत पांडे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, वनराईचे किशोर धारिया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुनिताजी (दिल्ली), डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अरूंधती पाटील यांची उपस्थिती होती.
या पाणी परिषदेत वाढता दुष्काळ, बदलते हवामान, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी, वृक्षारोपण, लोकसहभागातून पुनर्भरणासाठी करावयाची कामे, दुष्काळी स्थितीत सामाजिक संस्थांकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना करण्यात येणारी मदत अशा विविध बाबींवर चर्चा झाली. डॉ.सुमंत पांडे, सुनिताजी, अरविंद कर्वे, रुपाली ठोंबरे, पांडुरंग साबळे, राजेश पंडित, रमेश भिसे, चंदू बडवाई, जयाजी पाईकराव, प्रकाश पाटील, नरेंद्र चुंग, डॉ. नरेंद्र काळे आदींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. तसेच मराठवाड्यात ८२ टक्के खडक हा जमिनीतील पाणी मुरवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा अहवाल डॉ. अशोक तेजानकर यांनी मांडला. पाणी बचतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची चर्चा या परिषदेत झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एका माठात पाणी सोडून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पृथ्वीचे जलपुनर्भरण ही संकल्पना यावेळी मांडण्यात आली.
प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अनिकेत लोहिया यांनी केले. संचालन प्रा. किशन शिनगारे यांनी केले. आभार हनुमंत साळुंके यांनी मानले.