‘शिवशाही’त ४० प्रवासी गुदमरले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:44 IST2019-05-12T00:43:07+5:302019-05-12T00:44:04+5:30
खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे.

‘शिवशाही’त ४० प्रवासी गुदमरले !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे. शनिवारी औरंगाबाद ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या शिवशाही बसमधील प्रवाशांना ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ याप्रमाणे अनुभव आला. एसी बंद पडल्याने दोन तास प्रवाशांची घुसमट झाली. साध्या बसच्या तुलनेत दीडपट भाडे भरून बसमधील ४० प्रवाशांना गुदमरण्याची वेळी आली.
दुपारी २ वाजता सिडको येथून औरंगाबाद- अंबाजोगाई शिवशाही बस निघाली. त्याचवेळी कमी गतीमध्ये एसी सुरु असूनही प्रवासी घामाघूम झाले. उन्हामुळे बस तापली आहे. काही वेळाने थंड वाटेल असे वाहकाने सांगितले. मात्र, पाचोडजवळ बस येताच एसी पूर्णत: बंद पडला. त्यामुळे सर्वच प्रवाशांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. बसचे ‘रुफ विन्डो’ लॉक झाल्याने उघडता आली नाही. येथे काहीच करता येत नाही, म्हणत चालकाने वेळ मारुन नेली. घुसमटलेल्या काही प्रवाशांनी आॅनलाईन तक्रार केली. कसेबसे बीडला पोहोचल्यानंतर प्रवाशांची तक्रार ऐकून घ्यायला कोणी तयार नव्हते. अखेर नियंत्रण कक्षातील पुस्तिकेत दहा जणांनी तक्रार नोंदवली.
२५५ रुपये भाडे घेणाºया शिवशाहीत साध्या बसइतकीही सुविधा मिळू न शकल्याने तिकिटाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी मन:स्ताप झालेल्या प्रवाशांनी केली. बसमध्ये आजारी, दमा असणारा प्रवासी असता तर अघटित घडले असते, असे रामेश्वर क्षीरसागरसह इतर प्रवाशांनी सांगितले.