‘जलयुक्त’ने पाणीटंचाईत आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:53 IST2019-07-29T00:52:57+5:302019-07-29T00:53:21+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

‘जलयुक्त’ने पाणीटंचाईत आधार
अनिल भंडारी। लोकमत न्यूज नेटवर्क
ुबीड : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर २ लाख २२ हजार ७१०.४६ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षात पर्जन्यमान दरवर्षी कमी होत राहिलेतरी सध्याच्या टंचाईकाळात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्तच्या कामांमुळे मोठा आधार झाला आहे.
भ्रष्टाचाराचा डाग
२०१५ ते २०१८ दरम्यान राबविलेल्या योजनेत जिल्ह्यातील ८८३ पैकी ३०७ कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष शासनाच्या दक्षता पथकाने चौकशीनंतर काढला. उर्वरित ५७६ कामांची चौकशी गुलदस्त्यात आहे. कृषी विभागातील २६ अधिकारी, सहायक, पर्यवक्षक, तसेच १३८ मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले.बहुतांश जण अद्याप कारागृहात आहे. काही बडे मासा मात्र मोकाटच आहेत.
कामे
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर
दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.
जलसंधारणातील सर्वात यशस्वी योजना आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचनक्षेत्र वाढले. त्यामुळे टंचाईच्या काळात सोय झाली. टॅँकरमुक्तीसोबतच शेतीला फायदा झाला. हे टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा.
- दिलीप जाधव, बीड तालुका कृषी अधिकारी