महागाईच्या भडक्यात मसाल्यांचा ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:26+5:302021-08-23T04:35:26+5:30
बीड : रोजच्या आहारात महत्त्वाच्या असलेल्या मसाल्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. मागील तीन महिन्यांपासून मसाल्यांचे भाव चढेच असून काही ...

महागाईच्या भडक्यात मसाल्यांचा ठसका
बीड : रोजच्या आहारात महत्त्वाच्या असलेल्या मसाल्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. मागील तीन महिन्यांपासून मसाल्यांचे भाव चढेच असून काही घटकांचे भाव दुप्पट झाल्याने
स्वयंपाकाची चव महागली आहे.
जिल्ह्यात उन्हाळ्यात घरोघरी मसाले तयार केले जातात. त्यामुळे मार्चपासून मसाल्यातील घटकांना चांगली मागणी राहिली. कोरोना काळात मसाल्यातील काही घटकांचा इम्युनिटी वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वापर झाला. मागणी आणि पुरवठा सुरळीत राहिल्याने एप्रिल- मेपर्यंत दर सध्याच्या तुलनेत कमी होते; मात्र जूनपासून मसाल्याचे दर वाढतच गेले. अफगाणिस्तानातील युद्धजन्य परिस्थिती व अन्य कारणे यामागे असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. मसाले महागल्याने रोजच्या जेवणात ते वापरताना सर्वसामान्यांना आता विचार करावा लागत आहे. खाद्यतेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट चांगलेच कोलमडले आहे.
असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
रामपत्री १००० १२००
बदामफूल ६८० ११००
मसाला वेलची ५४० ७८०
काळी मिरी ४०० ५५०
चक्रीफूल ७०० १४००
नाकेश्वरी १२०० २०००
लवंग ५८० ७१०
जायपत्री २००० २४००
-----------
महागाई पाठ सोडेना !
मागील काही महिन्यांपासून सगळेच महाग झाले आहे. उत्पन्न मात्र घटले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गरीब घटकांनी कसे जगायचे ? गॅस, गोडेतेल, साखर, डाळींचे भाव खूपच वाढले आहेत. ही महागाई कधी कमी होणार?
- गंगा मनोज तावरे, गृहिणी.
-------
इतर बाबी महागल्या तर काही वाटत नाही, पण स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. मसाला तर एक हजार रुपये किलो झाला आहे. स्वयंपाक करताना आम्हा गृहिणींना विचार करावा लागत आहे.
- पल्लवी बागलाने, काकडहिरा, बीड.
म्हणून वाढले दर
भारतातील केरळ, काश्मिर तसेच इंडोनेशिया, ग्वाटेमाला, श्रीलंका, अफगाणिस्तानातून मसाल्यासाठी लागणाऱ्या घटकांची आयात होते. तेथे उत्पादन घटल्याने व सगळीकडे मागणी वाढल्याने हे दर कमालीचे वाढले आहेत. -- गंगाबिशन करवा, व्यापारी, बीड.
----------
अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे मसाल्यांचे घटकपदार्थ ४० ते ५० टक्क्यांनी महाग झाले आहेत. आणखी भाव वाढतील, असा अंदाज आहे. श्रावणमासामुळे मसाल्यांना मागणी नाही. बाजारात इतर ग्राहकांचीदेखील फारशी मागणी नाही. - जयनारायण अग्रवाल, व्यापारी, बीड.
----------