अंबाजोगाई बसस्थानकात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:54+5:302021-06-01T04:24:54+5:30
पाणी आहे; पण लाइट गुल, उभी पिके संकटात अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित ...

अंबाजोगाई बसस्थानकात शुकशुकाट
पाणी आहे; पण लाइट गुल, उभी पिके संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित होतो. जिथे वीज पुरवठा सुरू आहे, तिथे अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे विद्युत पंप चालत नाही. त्यामुळे शेतातील ऊस, भाजीपाला व विविध पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.
कोरोनाचे संकट व त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिल भरण्याची स्थिती नसताना वीज मंडळाने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.
‘मास्कचा नियमित वापर गरजेचा’
बीड : कोरोनावर मात करण्यासाठी बीड शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर नियमितपणे केला पाहिजे, असे प्रतिपादन समाजसेविका सुरेखा जाधव यांनी केले. जाधव यांनी म्हटले की, कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी मोठे सहकार्य केले. त्याच पद्धतीने आताही काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत, शिवाय घर व परिसरात स्वच्छता राखावी, सॅनिटायझरचाही वापर नियमित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.
रस्त्याच्या कामाला सुरुवात
धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
दारूची विक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.