गोदाकाठावर ऊसाची विक्रमी लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:05+5:302021-01-13T05:28:05+5:30
राजेश राजगुरु तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या ...

गोदाकाठावर ऊसाची विक्रमी लागवड
राजेश राजगुरु
तलवाडा : गेवराई तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले असून बंधारे, कालव्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे या भागात ऊसाचे विक्रमी क्षेत्र वाढले असले तरी कार्यक्षेत्रात साखर कारखाना मात्र एकच आहे. पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मनात असतानाही ऊस लागवड सुरूच आहे.
गत काही वर्षांच्या चांगल्या पावसानंतर पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. गोदावरीवरील सर्वच बंधाऱ्यात पाणी साचल्याने गोदाकाठच्या विहिरी, बोअरच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. तसेच पैठणच्या उजव्या कालव्यातून वेळोवेळी पाणी सोडले जात असल्याने याचाही मोठा आधार शेतकऱ्यांना आहे. परिणामी यावर्षी जूनपर्यंत पाण्याचा म्हणावा असा तुटवडा जाणवणार नसल्याची आशा असल्याने, या भागातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.
गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदाकाठ लाभला असल्याने पाणी मुबलक आहे. यावर्षी कापसाचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांनी लवकरच म्हणजे ऑक्टोबरपासूनच शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस सुरुवात केली. ती आजपर्यंतही सुरूच आहे. ऊसाला मिळणारा दर, भरवशाचे उत्पन्न, कमी खर्चामुळे या पिकाकडे कल आहे. दोन वर्षांच्या अति पावसाने पाण्याचे बरेचसे स्रोत भरलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सिंदफणा काठावरील गावे, उजव्या कालव्यावरील गावांसह कूपनलिका, विहिरीच्या पाण्याला पावसाने चांगला फरक पडल्याने तालुक्यात सगळीकडेच ऊस लागवड होत असल्याने ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणावर वाढले आहे.
इतर पिकांवर शेतकऱ्यांचा भरोसाच नाय
कापसाला बोंडअळीचे संकट, तूर, बाजरी, ज्वारी, गहू याला मिळणाऱ्या अल्प दरासह कडधान्य पिकांचीही उत्पादन, दराची अवस्था बघता ऊस हे काही ना देते, या भावनेने शेतकरी ऊसाला प्राधान्य देत असल्याने ऊस लागवड वाढत आहे.
जयभवानीसह इतर कारखाने नेतात ऊस
तालुक्यात जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकमेव हक्काचा कारखाना आहे. या कारखान्यासह माजलगावच्या कारखान्यासह परजिल्ह्यातील औरंगाबाद येथील छत्रपती संभाजी राजे व पश्चिम महाराष्ट्रातील गंगामाई, केदारेश्वर, वृद्धेश्वर कारखानेही तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत आहेत. या कारखान्यांच्या भरवशावर शेतकरी आहे. पण पुढील वर्षी त्यांच्याच क्षेत्रात ऊसाची वाढ झाल्यास ते कितपत ऊस घेतात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखाना हा एकच कारखाना आहे.