राशनवरील धान्य तीन किलोने कमी; गोडाऊनमध्येच मापात पाप असल्याचे दुकानदारांचे म्हणणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:53 IST2025-06-23T17:51:55+5:302025-06-23T17:53:47+5:30
एका कट्ट्यात तीन किलो धान्य कमी येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी

राशनवरील धान्य तीन किलोने कमी; गोडाऊनमध्येच मापात पाप असल्याचे दुकानदारांचे म्हणणे...
माजलगाव ( बीड) : स्वस्त धान्य दुकानातील बॅगमध्ये निर्धारित पेक्षा धान्याचे वजन कमी असल्याचे तालुक्यातील देपेगाव येथे ग्रामस्थांना निदर्शनास आले आहे. दोन ते तीन किलो धान्य कमी मिळत असल्याचे वजन केल्यानंतर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत धान्य घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आली. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
तालुक्यातील देपेगाव ग्रामस्थांनी राशन कमी मिळत असल्याबाबत तक्रारी करूनही पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात राशन दुकानावरील धान्यांच्या बॅगच्या वजनाबाबत जाब विचारला. यावेळी दुकानदार गंगाधर गिरी यांनी सांगितले की, आम्हाला गोडाऊन मधूनच अडीच ते तीन किलो धान्य कमी येते, आम्ही काही बोलायला गेलो तर आम्हाला धान्य दिले जात नाही. यामुळे माहित असूनही आम्हाला गप्प बसण्याची वेळ येते असल्याचे स्पष्टीकरण गिरी यांनी दिले.
दोन ते तीन किलो धान्य कमी
यावेळी इलेक्ट्रिक वजन काट्यावर राशनच्या गहू आणि तांदळाच्या बॅगचे वजन ग्रामस्थांनी केले. अनेक बॅगमध्ये दोन ते तीन किलो पेक्षा कमी माल असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसील प्रशासनातील अधिकारी विकास बळवंत यांच्याशी ॲड. गोले यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. कमी असलेले राशन पुढच्या खेपेला देऊ असे बळवंत यांनी सांगितले. यावर जर तुम्ही कमी पडलेले धान्य देत असाल तर तुम्ही काढून घेतले आहे.. तुम्ही देणार नसाल तर ते नेमके कुठे गेले आहे..? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
फौजदारी गुन्हे दाखल करावेत
माजलगाव तहसील अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन घोटाळा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांनी ही बाब हसण्यावर नेली. घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- ॲड. नारायण गोले पाटील ,नेते शेकाप
अहवाल देण्यास सांगितले
माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. पुरवठा विभागाच्या तहसीलदार प्राची ठाकूर यांना अहवाल देण्यास सांगितले आहे.
- संतोष रुईकर , तहसीलदार, माजलगाव