मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणारच; अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:03 IST2026-04-10T13:01:38+5:302026-04-10T13:03:10+5:30
मस्साजोगमध्ये निवडणुकीचा धुरळा! दिवंगत सरपंचांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, तर स्वरूपानंद देशमुखांच्या एन्ट्रीने 'बिनविरोध'ची चर्चा संपुष्टात.

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणारच; अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अर्ज दाखल
केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी होत असलेली पोटनिवडणूक आता चुरशीच्या वळणावर आली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांची निवड बिनविरोध होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वरूपानंद देशमुख यांनीही आपला अर्ज दाखल केल्याने ‘बिनविरोध’चे सर्व प्रयत्न थंडावले असून, आता निवडणूक अटळ झाली आहे.
माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (९ डिसेंबर २०२४) रिक्त झालेल्या या जागेसाठी अश्विनी देशमुख यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भावुक होत प्रतिक्रिया दिली की, अण्णांचे (संतोष देशमुख) स्वप्न होते की, आपले गाव देशात एक नंबरला असावे. त्यांनी पाहिलेली विकासाची ही अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मस्साजोगमध्ये यापूर्वी धनंजय देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा दावा केला होता; पण आता दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.
स्वरूपानंद देशमुखांचा ‘बिनविरोध’ प्रक्रियेवर आक्षेप
दुसरीकडे, स्वरूपानंद देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत वाढवली आहे. ‘बिनविरोध निवडीचा निर्णय केवळ २०-२५ लोकांनी मिळून घेणे म्हणजे लोकशाही नाही. गावात २० वर्षांपासून काम करत असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही संधी मिळायला हवी होती,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. १८ एप्रिल रोजी (अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर) पुराव्यासह काही गोष्टी लोकांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. संतोष देशमुखांच्या मृत्यूनंतर कोणी कोणी संधी साधून घेतली, याचा खुलासा करण्याचे त्यांनी ठरवले आहे.