एनसीसीमुळे घडते देशसेवा; बीड जिल्ह्याची उंचावतेय मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:42 IST2018-07-30T23:42:06+5:302018-07-30T23:42:33+5:30
एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जागा मोजक्याच आहेत. असे असले तरी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकवर्षी बीडमधील किमान ५० ते ६० विद्यार्थी देशसेवेसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.

एनसीसीमुळे घडते देशसेवा; बीड जिल्ह्याची उंचावतेय मान
बीड : एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जागा मोजक्याच आहेत. असे असले तरी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकवर्षी बीडमधील किमान ५० ते ६० विद्यार्थी देशसेवेसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. एनसीसी विभागाची यशस्वी वाटचाल तर सुरूच आहे, शिवाय प्रत्येकवर्षी यशाचा टक्काही वाढत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या पोलीस, सेना भरतीत बीडमधील ५० च्यावर विद्यार्थी निवडले गेले आहेत. यामुळे बीडची मान उंचावली आहे.
राष्ट्रीय छात्र सेना हा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार उपक्रम आहे. याबाबत जास्त कोणाला माहिती नाही. हाच धागा पकडून सोमवारी ‘लोकमत’ने शहरातील एनसीसी आॅफिसरशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या अडचणींसह यशाचा उलगडा केला. बीड शहरातील भगवान विद्यालय, शिवाजी विद्यालय, चंपावती विद्यालय या तीन शाळा आणि बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय आणि बंकटस्वामी महाविद्यालय अशा तीन महाविद्यालयांमध्ये एनसीसी विभाग कार्यरत आहे. यासाठी विशेष अधिकारीही नियूक्त केले आहेत. प्रत्येक सोमवार व मंगळवारी त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडूनच कपडे, बुट व इतर भत्ता दिला जातो. तसेच त्यांना लष्कर, पोलीस भरतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची शारिरीक व मानसिक चाचणी घेतली जाते. त्यांना अनुभव व पूर्व तयारी म्हणून प्रात्यक्षिके घेतली जातात. विशेष शिबीरांचे आयोजनही केले जाते. या सर्व परिस्थितीमुळे आणि एनसीसी आॅफिसरच्या योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी जाताना सहज यश मिळत आहे. यासाठी त्या त्या शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक़, प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगण्यात आले.
एनसीसीत सहभागासाठी ही आहे पात्रता
एनसीसीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर शाळा व महाविद्यालय स्तरावर वेगवेगळी पात्रता आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्याचे वय १३ वर्षापेक्षा जास्ता असावे, ५ फुटापेक्षा जास्त उंची असावी, धावण्यात सक्षम असावा. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्याचे वय १६ ते २५ वर्षे या दरम्यान असावे, उंची पाच फुट पाच इंच पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी निवडक वेळात धावण्याचे अंतर पार करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याची शारिरीक व मानसिक तंदरूस्ती आवश्यक आहे.
मुलींसाठी ३० टक्के आरक्षण
आतापर्यंत एनसीसीमध्ये केवळ मुलेच सहभागी होत होते. परंतु आता नियोजीत कोट्यात ३० टक्के मुलींचाही सहभाग असावा, असे निर्देश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापुर्वी बोटावर मोजण्याइतपतच मुली यामध्ये सहभागी होत असत.
सामाजिक उपक्रमांत अगे्रसर
रॅली, स्वच्छता, रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांत एनसीसी विभाग हा अग्रस्थानी असतो. तसेच आपत्ती व्यवस्थापनातही जीव धोक्यात घालून कार्य करतात. दोन वर्षापूर्वी बीडमध्ये आलेल्या बिंदुसरा नदीतीला पुरात या विभागातील मुलांनी कर्तव्य बजावून प्रशासनाला सहकार्य केले होते.
स्वतंत्र अधिका-याची गरज
एनसीसी विभागासाठी स्वंतत्र आॅफिसरची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी या आॅफिसरला शाळेतील इतर कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांना अनंत अडचणी येतात. तसेच सध्या ६०० ते ९०० रूपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते. ते वाढवून सहा ते सात हजार रूपये करावे, अशी मागणीही अधिका-यांमधून करण्यात आली.