भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:08 IST2020-11-26T13:37:16+5:302020-11-26T15:08:13+5:30
अपघात गेवराईजवळील बायपास रोडवर गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला.

भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार
गेवराई : चालकाचा ताबा सुटल्याने लातुरहून औरंगाबादकडे जाणारी कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या एका टँकरवर धडकली. या भीषण अपघात कारचा चुराडा झाला असून त्यातील चार जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात गेवराईजवळील बायपास रोडवर गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. मृत आणि जखमी हे लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
लातूरहून पाच जण एका कारने ( एमएच ४६ बी ९७०० ) औरंगाबादकडे जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास गेवराईजवळील बायपास रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील कार दुभाजक ओलांडुन समोरच्या रस्त्यावर गेली. यावेळी कार समोरून टँकरवर ( जीजे १६ एयु २४७५ ) आदळली. यात कारचा चुराडा झाला आणि त्यातील पाचही जण गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी ३ जण उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोघांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकजण गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमीचे नाव समजू शकले नसून मृतांमध्ये लातुर येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश असल्याची माहिती आहे.