हमीपेक्षा कमी भाव !
By Admin | Updated: December 29, 2014 00:58 IST2014-12-29T00:40:18+5:302014-12-29T00:58:10+5:30
संजय तिपाले , बीड निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचे केवळ गणित बिघडवले नाही तर जगण्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. जिथे पिकेच धड आली नाही, तेथे गुणवत्ता येणार कशी? हा साधा प्रश्न आहे;

हमीपेक्षा कमी भाव !
संजय तिपाले , बीड
निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचे केवळ गणित बिघडवले नाही तर जगण्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. जिथे पिकेच धड आली नाही, तेथे गुणवत्ता येणार कशी? हा साधा प्रश्न आहे; परंतु केंद्र सरकारच्या कापूस महामंडळाने हा सवाल उपस्थित करत हमीभावापेक्षा शंभर रुपये क्विंटलमागे कमी देण्याचा फतवाच काढला आहे. या फतव्याने ‘दुष्काळात तेरावा’ अशी स्थिती निर्माण झाली असून दरकपातीची ‘मेख’ शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणणारी आहे.
कापूस उत्पादनात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या बीडमध्ये यावर्षी लागवडक्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढले होते. सुमारे ४ लाख २० हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापूस आहे. मात्र, सुरुवातीपासून रुसलेला पाऊस शेवटपर्यंत फिरकलाच नाही. अल्पशा पावसाने कापसाची वाढ खुंटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला़ गतवर्षी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईची निर्मिती झाली होती़ यंदा उत्पादन निम्म्यापेक्षा अधिक घटल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. दुष्काळाशी लढा देत बोंड- बोंड आलेला कापूस शेतकऱ्यांनी वेचून घरात आणला.
कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची निराशाच झाली. कापसाला गतवर्षी ४ हजार इतका भाव होता. यावर्षी त्यात केवळ ५० रुपयांची वाढ झाली. (सीसीआय) कापूस महामंडळाने जाहीर केलेल्या ४ हजार ५० इतक्या हमीभावाने कापूस खरेदीही सुरु झाली ; परंतु कापसाची गुणवत्ता तपासण्यासाठी ११ तालुक्यांतून कापसाचे नमूने गोळा करुन तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.
त्याचा अहवाल आल्यानंतर कापसाच्या धाग्याची लांबी २७ इंच तर तलमतेची प्रतवारी ३ पेक्षा कमी आढळली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ निमशासकीय खरेदी केंद्रांना कापूस महामंडळाने नोटिसा पाठवून गुणवत्ता कमी आढळली तर हमीपेक्षा कमी भावाने देयके अदा करावित, असा फतवा काढला.
क्विंटलमागे ४ हजार ५० ऐवजी आता ३ हजार ९५० इतकेच रुपये टेकविले जातात. त्यामुळे दुष्काळ व दरकपात अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत़
प्रतवारीची अट शिथील करा
जिल्ह्यात वर्षभरात १२५ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही़ दुष्काळी स्थितीबरोबरच कापसाला हमी भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे़ प्रतवारीसाठी अडवणूक करण्याऐवजी ही अट शिथील करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे़ शेतकऱ्यांना अडवणुकीऐवजी सावरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले़
एका हेक्टरमध्ये सरासरी २७५ किलो रुईचे उत्पादन मिळते़ जिल्ह्यात गतवर्षी सरासरी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईचे उत्पादन झाले होते़ यंदा सीसीआयने आतापर्यंत केवळ १ लाख ९२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापसाचा झाडा होऊ लागल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.४
पुरेसा पाऊस न पडल्याने कापसाच्या झाडांची पूर्ण वाढ झाली नाही. शिवाय पावसाअभावी झाडेही जागेवरच वाळून गेली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत धाग्याची लांबी व तलमता कमी होणे अपेक्षितच होते, असे जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कापूस महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एच़ डी़ दळवी म्हणाले, दुष्काळ आहे परंतु आम्हाला नियम डावलता येत नाहीत़ ४ हजार ५० इतका भाव देताना २९ स्टेपल लेंथ व ३़६ इतकी प्रतवारी आवश्यक आहे़ जिल्ह्यात कुठेच ही प्रतवारी नाही़ त्यामुळे क्विंटलमागे १०० रूपये दरकपात करावी लागली आहे़