बीडमध्ये चार माणसं, ६३ जनावरं मेली, शेतीचेही नुकसान; मंत्री, खासदार, आमदार आहेत कुठं?
By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:58 IST2025-05-27T12:58:12+5:302025-05-27T12:58:50+5:30
शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीच येईना; नुकसानभरपाई सोडा, पाहणीसाठीही कोणी जाईना

बीडमध्ये चार माणसं, ६३ जनावरं मेली, शेतीचेही नुकसान; मंत्री, खासदार, आमदार आहेत कुठं?
बीड : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आतापर्यंत वीज पडून व इतर अपघातांमध्ये चार माणसे आणि ६३ जनावरे दगावली आहेत. फळबागा, बागायती जमिनींचे नुकसान झाले आहे. रस्ते खचले, पूलही वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वादळ वाऱ्यात घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. असे असतानाही अद्यापतरी लोकप्रतिनिधी म्हणून एरव्ही बांधावर जाऊन फोटोसेशन करणारे मंत्री, खासदार, आमदार सामान्यांच्या मदतीसाठी धावलेले नाहीत. नुकसानभरपाई देणे तर सोडाच पण साधी भेट देण्याची तसदीही कोणी घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांना कोणी वाली आहे की नाही? मंत्री, खासदार, आमदार आहेत तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साधारण ७ जूननंतर पावसाला सुरुवात होत असते. परंतु यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळा तर वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात शेतात काम करताना, घरी जाताना, गोठ्यात बसल्यावर अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. तसेच अंगावर झाड पडून, वीज पडून व इतर नैसर्गिक अपघातात आतापर्यंत ६३ लहान-मोठे जनावरी दगावली आहेत. तसेच पावसाने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना भरपाई देण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे. परंतु अद्याप तरी मंत्री, खासदार, आमदार हे बांधावर गेलेले नाहीत. खरीप पेरणी झालेली नसली तरी त्या आधीही भरपूर नुकसान झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तरच शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यास मदत होणार आहे.
३८ हेक्टर जमीन खरडून गेली
२२ मे रोजी आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. तसेच याच पावसाने तब्बल ३८ हेक्टर जमीन खरडून गेल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
अशी आहे नुकसानीची आकडेवारी
जीवितहानी
मयत - ४
जखमी - ३
जनावरे - ६६
शेतीचे नुकसान
बागायत जमीन - १३३ हेक्टर
फळबाग - ७७ हेक्टर
घरांची पडझड - ३३
गोठे - ६
मदतीसाठी सरसावले शेकडो हात
वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमन्यू पांडुरंग नलबे (४०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली, एक मुलगा आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने मदतीसाठी शेकडाे हात सरसावले. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भेट देत मदत केली. परंतु विद्यमान कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, असे बद्रिनाथ व्हरकटे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत हेच राजकीय नेते दिवसातून चार चकरा मारत होते. अशीच अवस्था इतर ठिकाणची आहे.
अजित पवार बीडचे पालकमंत्री
अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी सोमवारी सकाळीच बारामतीमध्ये जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परंतु बीड जिल्ह्यातही अनेकांचे जीव गेले असून, नुकसानही झाले आहे. ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना येणे शक्य नसले तरी इतर मंत्र्यांना पाठवून त्यांनी पाहणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा राहील. दोन दिवसांपूर्वी आलेले मंत्री संजय शिरसाट यांनीही अनेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या; परंतु नुकसानीची पाहणी अथवा मयतांच्या कुटुंबांची भेट घेतली नाही.
बीड शहरात पायी चालणे अवघड
बीड शहरात तर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. थोडाही पाऊस झाला की नाल्यातील पाणी आणि कचरा रस्त्यांवर येतो. सर्वत्र घाणच घाण आणि चिखल होतो; परंतु यावरही कोणीच बोलायला तयार नाही. निवडणुका जाहीर होताच पाण्यासाठी काही लोक आक्रमक झाले आणि पत्रकबाजी केली. परंतु नंतर त्याचे पुढे काय झाले? याचा कोणीही पाठपुरावा केला नाही. याचा त्रास सामान्य बीडकरांना बसत आहे. अशीच अवस्था इतर शहरे आणि अनेक गावांमधील आहे.