सहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला चालक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:23+5:302021-03-17T04:34:23+5:30
बीड : मद्यधुंद अवस्थेत रिक्षा, दुचाकी, पिकअप या वाहनांना दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ७ ...

सहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला चालक जेरबंद
बीड : मद्यधुंद अवस्थेत रिक्षा, दुचाकी, पिकअप या वाहनांना दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पांगरबावडी परिसरात घडली होती. त्यानंतर ट्रकचालक फरार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. त्याला मंगळवारी बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
प्रकाश संजय चौरे (रा. नारेवाडी ता. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रकाश हा सरकी घेऊन बीडमध्ये आला होता. मात्र, सायंकाळी झाल्यामुळे गावाकडे रात्री थांबण्यासाठी बीडहून ट्रक (एम.एच.०९ सी.व्ही.९६४४) घेऊन वडवणीमार्गे गावी जात होता. त्यावेळी पांगरबावडी जवळ एका प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पुढे एका दुचाकी व मालवाहू रिक्षालादेखील धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक चौरे फरार झाला होता. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.