चालक, क्लिनर जेवायला थांबले अन् पोलिसांनी पकडला ४५ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:57 IST2019-02-22T23:56:43+5:302019-02-22T23:57:14+5:30
उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा ट्रक गढीजवळ एका हॉटेलवर चालकांनी जेवणासाठी थांबविले. याचवेळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकली.

चालक, क्लिनर जेवायला थांबले अन् पोलिसांनी पकडला ४५ लाखांचा गुटखा
गेवराई : उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा ट्रक गढीजवळ एका हॉटेलवर चालकांनी जेवणासाठी थांबविले. याचवेळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये ४५ लाख रूपयांचा गुटखा आणि ट्रक असा ५५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांना ताब्यातही घेतले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.
उस्मानाबादहून आलेला ट्रक (एमएच १८/एए ६८४५) गेवराई-गढी रस्त्यावर चालकांनी जेवणासाठी थांबविला. हीच माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. चालक जेवणात व्यस्त असतानाच पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये गुटखा असल्याची खात्री केली. जेवण संपवून चालक, क्लिनर ट्रकमध्ये बसून निघण्याच्या तयारीत असतानाच पथकातील कर्मचाºयांनी झडप घालत त्यांना पकडले. एकनाथ दत्तु परदेशी (रा.संजय नगर, ता.श्रीरामपुर, जि. अहमदनगर), शेख जब्बार शेख (रा.जे.पी रोड, लोहगाव पुणे) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. ट्रकची पडताळणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या ८० पिशव्या दिसल्या. याची किंमत अंदाजे ४५ लाख रूपये असल्याचे सांगण्यात येत असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. असा एकूण ५५ लाख रूपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळविण्यात आलेले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार आणि अनिकेत भिसे यांच्याकडून पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भूषण सोनार, पथक प्रमुख उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.
राजापुरमध्ये टिप्पर पकडला
गेवराई तालुक्यातील राजापूर येथून अवैध वाळू उपसा करणारे टिप्परही विशेष पथकाने पकडले. चालकाला ताब्यात घेत तलवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. जवळपास १५ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयातअहवाल पाठविल्याचे तलवाडा पोलिसांनी सांगितले.