जेवणाचे भांडण विकोपाला; विळ्याने केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:04 IST2018-12-11T01:03:52+5:302018-12-11T01:04:11+5:30

पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला.

Attack on one from quarrel | जेवणाचे भांडण विकोपाला; विळ्याने केला वार

जेवणाचे भांडण विकोपाला; विळ्याने केला वार

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली. यात चौघे गंभीर जखमी झाले असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
पाटोदा येथील गणेश बळीराम सरवदे, शीतल उर्फ बाबासाहेब काशिनाथ सरवदे, जयपाल रामेश्वर सरवदे आणि प्रताप बळीराम सरवदे हे शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता गणेशच्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील प्रमोद लिंबाजी कांबळे (वय ३६) हा तिथे आला. पंधरा दिवसापूर्वी एका प्रार्थनास्थळी जेवणाच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून प्रमोदने गणेशच्या गळ्यावर विळ्याने वार केला. परंतु, गणेशने वार चुकविला मात्र त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. यावेळी गणेश सोबतच्या तिघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रमोदने त्यांच्यावरही विळ्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गणेशच्या फिर्यादीवरून प्रमोद कांबळे याच्यावर कलम ३०७, ३२४, ३२६, ५०६ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रमोद कांबळे याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास फौजदार भिकाने हे करत आहेत.
दरम्यान, गणेश सरवदे आणि त्याच्या सोबतच्या तिघांनीच मला मारहाण केली अशी तक्रार प्रमोद कांबळे याने दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून चौघांवरही कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पो.ह. भुसारी करत आहेत.

Web Title: Attack on one from quarrel