बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:41 IST2025-05-27T12:40:39+5:302025-05-27T12:41:23+5:30

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी

66 'Vaishnavi' women return from death row in Beed; 108 women need 'confidence' from police | बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीड : तू दिसायला चांगलीच नाहीस, तुला काही येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी हुंडाच दिला नाही, यांसारख्या कारणांनी १७४ विवाहितांनी पोलिसांकडे धाव घेतली. यात समुपदेशन करून ६६ जणींचे संसार जोडण्यात आले. तर, आणखी १०८ जणींना पोलिसांकडून ‘भरोसा’ मिळणे बाकी आहे. तडजोड झालेल्या प्रकरणांतील अनेक विवाहितांनी आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, पोलिसांनी ‘भरोसा’ दिल्याने त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत.

सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली होती. यातील आरोपी हे राजकीय असल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांनीही टीका केली, परंतु अशाच वैष्णवी प्रत्येक जिल्ह्यात सासरच्या छळाला वैतागल्या आहेत. त्यामुळेच त्या पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेतात. बीडमध्ये अशा विवाहितांसाठीच भरोसा सेल कार्यरत आहे.

काय करतोय भरोसा सेल ?
विवाहितांची तक्रार घेतली जाते. त्यानंतर आठवडाभरात तिच्या पतीसह सासरच्या लोकांना बोलावून घेतले जाते. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर दोघांनाही बोलावले जाते. समोरासमोर बसवून समस्या जाणून घेत समुपदेशन केले जाते. अनेक प्रकरणात पहिल्याच तारखेत तडजोड होते. तर काही प्रकरणात चार पाच वेळा बोलावून घेतल्यावर तडजोड होते. ज्यात होत नाही, अशावेळी विवाहिताला पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पाठविले जाते.

काय आहेत कारणे ?
तुला स्वयंपाक बनवता येत नाही, तुला मुलच होत नाही, तू काळीच आहेस, घर बांधण्यासाठी, व्यावसायासाठी, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, लग्नात हुंडाच दिला नाही, मानपान दिला नाही, तुझे बाहेर अनैतिक संंबंध आहेत, तू फोनवरच सारखे बोलतेस, तू मोबाइल वापरू नकोस, तू आई-वडिलांना बोलायचेच नाहीस, तू माझ्या आई-वडिलांना मानपान देत नाहीस, उलटच का बोलतेस? असे विविध कारणे विवाहितांच्या छळाची आहेत.

विवाहिता का करतात आत्महत्या?
सासरच्या लोकांचा सततचा त्रास आणि माहेरच्या लोकांना त्रास नको, म्हणून विवाहिता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलात. परंतु, असे न करता छळ होत असल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे तक्रार करावी. येथे समुपदेशनाने तडजोड केली जाते. यामुळे अनेक विवाहिता आत्महत्याचा विचार डोक्यातून काढत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस २४ तास तत्पर
भरोसा सेलमध्ये तक्रार येताच दोघांना बोलावून घेत समुपदेशन केले जाते. त्यांच्यात तडजोड व्हावी, हाच पोलिसांचा उद्देश असतो. यात आम्हाला यश येत आहे. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. प्रत्येक समस्याला मार्ग असतो. पोलिस आपल्यासाठी २४ तास तत्पर आहे.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

२०२५ मधील आकडेवारी
एकूण अर्ज १७४
तडजोड - ६६
प्रलंबित - १०८

Web Title: 66 'Vaishnavi' women return from death row in Beed; 108 women need 'confidence' from police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.