इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:20 IST2025-08-22T17:20:06+5:302025-08-22T17:20:30+5:30
'इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे.'

इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
Nitin Gadkari on Ethanol : भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E10, E20) उपलब्ध होऊ लागल्यापासून विविध प्रकारच्या नकारात्मक चर्चांनाही वेग आला आहे. असे म्हटले जात आहे की, इथेनॉलचा वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतो आणि इंधन कार्यक्षमता किंवा मायलेज देखील कमी होते. मात्र, सामान्य लोकांमध्ये गैरसमज पसरवले गेले आहेत, असे केंद्र सरकारचे म्हणने आहे. पण हे गैरसमज कोणी पसरवले? याबद्दल रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत 20% इथेनॉल असलेल्या पेट्रोलबद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांवर नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे म्हटले की, E20 इंधन (20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) गाडीच्या इंजिनला नुकसान पोहोचवते किंवा वाहनांसाठी धोकादायक आहे, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. जगातील अनेक देशांमध्ये अशाप्रकारचे इंधन यशस्वीरित्या वापरले जात आहे. एक विशेष पेर्टोलियम लॉबी आहे, जी खोटी माहिती पसरवत आहे आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे.
गडकरी पुढे म्हणाले, ब्राझीलमध्ये २७% पर्यंत इथेनॉल मिसळले जाते, वाहनधारकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. तांत्रिकदृष्ट्या आम्ही सर्वकाही तपासले आहे. आम्ही जुन्या वाहनांवरही चाचण्या केल्या आहेत. काही लोक पेट्रोलियम लॉबीशी संबंधित आहेत, जे खोटी माहिती पसरवत आहेत. इथेनॉल शेतकरी आणि देश दोघांसाठीही फायदेशीर आहे. इथेनॉल हे खूप चांगले आणि स्वच्छ इंधन आहे. ते गावातील अर्थव्यवस्था मजबूत करते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवते आणि तेल आयात कमी करते.
भारताने जुलै २०२४ मध्येच पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठले आहे. प्रदूषण कमी करणे आणि महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी आणि देश दोघांसाठीही हे फायदेशीर आहे, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आकडेवारीही सादर केली. त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मक्याचे उत्पादन तीन पटीने वाढले आहे. मक्याची किंमत प्रति टन १४-१५ हजार रुपयांवरून २४-२५ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही किंमत प्रति क्विंटल १,२०० रुपयांवरून २,८०० रुपयांपर्यंत वाढली आहे.