कोरोनाला हद्दपार करण्याचा उद्योजकांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:04 AM2021-02-28T04:04:27+5:302021-02-28T04:04:27+5:30
औरंगाबाद : आता कोणालाही लॉकडाऊन परवडणार नाही. त्यामुळे केवळ उद्योगच नव्हे, तर कोरोनाला समाजापासून हद्दपार करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या ...
औरंगाबाद : आता कोणालाही लॉकडाऊन परवडणार नाही. त्यामुळे केवळ उद्योगच नव्हे, तर कोरोनाला समाजापासून हद्दपार करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना व त्याबाबतची जागृती करण्यास कटिबद्ध आहोत, असा विश्वास उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी विभागीय आयुक्तांना दिला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली. केवळ उद्योगातील कामगार- कर्मचारीच नव्हे, तर घरातील त्यांचे सदस्य, स्वत: उद्योजक व त्यांच्या कुटुंबानेदेखील कोरोनाच्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला, तर प्रशासनासमोर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, अशी शक्यता केंद्रेकर यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित उद्योग संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी विभागीय आयुक्तांना विश्वास दिला की, आता कुठे उद्योगाची गाडी रुळावर येत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व उद्योग, पुरवठादार, कामगार- कर्मचाऱ्यांना तोंडी व लेखीस्वरुपात कोरोनाबाबत दक्षता घेण्यासंबंधी आवाहन केले जाईल. एवढेच नाही, तर प्रत्येकाने मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, नियमित हात धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, तापमान व ऑक्सीजनचे प्रमाण नियमित मोजणे या बाबींचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, याविषयी जागृती केली जाईल. बैठकीत ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, शिवप्रसाद जाजू, सतीश लोणीकर, ‘सीआयआय’चे नूतन अध्यक्ष, रमन अजगावकर, मासिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, प्रीतीश चटर्जी आदी उपस्थित होते.
.