पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 03:41 PM2019-07-11T15:41:36+5:302019-07-11T15:41:45+5:30

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही.

Water supply by 424 tankers even after 40 days of monsoon | पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext

अमरावती : पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४१६ गावांमध्ये ४२४ टँंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय तात्पुरती उपाययोजना या अर्थाने २३७२ विहिरी दोन हजारांवर गावांची तहान भागवित असल्याचे पश्चिम विदर्भातील वास्तव आहे. 
यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत सरासरी २३४.९ मिमी पावसाची अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६६.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ७२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यात फक्त बुलडाणा जिल्ह्यात १०३ टक्के पाऊस पडला. उर्वरित चारही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. सरासरीच्या सर्वात कमी ४५.५ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झालेला आहे. अमरावती ६६.७, अकोला ८३.७ व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६४.४ टक्के  पाऊस पडला आहे.

कमी पावसामुळे नदी-नाले प्रवाहीत नाही. प्रकल्प क्षेत्रातदेखील हीच स्थिती कायम असल्याने जलसाठा तसूभरही वाढलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचे जलास्त्रोत कोरडेच आहेत. जमिनीत आर्द्रताअभावी अर्ध्याअधिक क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. भर पावसाळ्यात ही स्थिती ओढावल्याने राज्य शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. हा तहानलेल्या गावांना दिलासा असला तरी पावसाची एकंदरीत स्थिती व हवामानतज्ज्ञांची माहिती गृहीत धरता जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ देणे महत्त्वाचे आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत धारणी, तेल्हारा, बाळापूर, बुलडाणा चिखली, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात पावसाने सरासरी पार केली तर भातकुली, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मूर्तिजापूर, यवतमाळ, कळंब, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी-जामणी, बुलडाणा व देऊळगाव राजा या तालुक्यात पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे.

या आहेत पाणीटंचाईच्या उपाययोजना
पश्चिम विदर्भात जुनअखेर ७७६ विंधन विहिरी, १२७ नळयोजनांची विशेष दुरूस्ती, ७४ तात्पुरत्या नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ५६८ टँकर व २३७२ खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यासाठी एकूण ७८ कोटी ५५ लाख ५९ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी १०.२९ कोटी, नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी १२.३७ कोटी, तात्पुरत्या नळ योजनांसाठी ९.७१ कोटी, टँंकरने पाणी पुरवठ्यासाठी ३२.६० कोटी, विहिरींच्या अधिग्रहणासाठी १३.५७ कोटींची आवश्यकता आहे.

टँकरने पाणीपुरवठ्याची जिल्हानिहाय स्थिती (५ जुलै)
जिल्हा        तालुके    गावे    लोकसंख्या     टँकर
अमरावती    १०    ५६    १,२२,७६६    ५७
अकोला    ६    २९    ७१,९१९    ३४
यवतमाळ    ८    ७२    १,१७,४४०    ७२
बुलडाणा    १२    १९३    ३,७७,७९७    १९७
वाशिम        ६    ६६    १,१४,२३६    ६४
एकूण        ४२    ४१६    ८,०४,१५८    ४२४

Web Title: Water supply by 424 tankers even after 40 days of monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.