विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत सोडणार; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:00 IST2026-04-04T12:58:39+5:302026-04-04T13:00:14+5:30
Amravati : विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

Tigers from Vidarbha will now be released back into the Sahyadri; Permission from the National Tiger Authority
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व नगण्य झाले होते. मात्र, निसर्गसाखळी कायम राखण्यासाठी तिथे वाघ असणे गरजेचे आहे. विदर्भात विशेषतः पेंच आणि ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रादेशिक वर्चस्वासाठी वाघांमध्ये झुंज होतात. हे टाळण्यासाठी आठ वाघांना टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात सोडले जाईल. यापूर्वी पाठविलेले वाघ तिथे 'रमले' असल्याने वनविभागाचा आत्मविश्वास वाढला आहे. सह्याद्रीत २५ ते ३० वाघांचे संगोपन होऊ शकते, असे नियोजन आखले आहे.
सह्याद्रीत पर्यटनाला मोठा वाव
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली की, मुंबई, पुणे, ठाणे, कर्नाटक या भागांतून पर्यटकांना वाघ बघण्याची संधी सहज उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पाच वाघांचे स्थलांतर होणार असल्याची माहिती आहे. त्याकरिता सह्याद्रीतून उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षकांची चमू गत आठवड्यात विदर्भाचा दौरा करून गेली.
भटकंती करणाऱ्या वाघिणी टार्गेट
स्थलांतरित प्राणी नवीन जागी रुळतील का, हा मोठा प्रश्न असतो. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर नवीन ठिकाणी भक्ष्य आणि पाण्याचे स्रोत मुबलक असेल, तर हे प्राणी तिथे लवकर स्थिरावतात. सह्याद्रीत सध्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून वाघांना शिकारीसाठी भटकंती करावी लागणार नाही. विशेषतः विदर्भात व्याघ्र प्रकल्पाबाहेर भटकंती करणाऱ्या वाघिणीला सह्याद्रीत पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यातही ४ ते ६ वर्षे वयोगटाला प्राधान्य दिले जाणार आहे.
वनविभागाचे धोरण काय?
- संख्या संतुलन : विदर्भातील अतिरिक्त वन्यजीवांचे इतरत्र स्थलांतर करून नैसर्गिक संतुलन राखणे.
- संघर्ष निवारण : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 'हॉटस्पॉट'मधील प्राणी हलविण
- शास्त्रीय देखरेख : स्थलांतरित केलेल्या प्रत्येक वाघावर 'रेडिओ कॉलर'द्वारे नजर ठेवली जाणार आहे.
"विदर्भातील व्याघ्र संवर्धन जागतिक स्तरावर कौतुकास्पद आहे. मात्र, वाढती संख्या व्यवस्थापित करण्यासाठी सह्याद्रीसारख्या सुरक्षित अधिवासात त्यांचे पुनर्वसन करणे हाच्च सर्वोत्तम पर्याय आहे. 'एनटीसीए'ने आठ वाघांच परवानगी दिली होती, त्यापैकी तीन वाघ सह्याद्रीत पाठविले आहेत."
- एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र