अकोल्याच्या मातीत घुमला होता भीमगर्जनांचा निनाद; 'त्या' खोलीत आजही जपला आहे बाबासाहेबांचा सहवास !
By गणेश वासनिक | Updated: April 13, 2026 16:02 IST2026-04-13T16:00:56+5:302026-04-13T16:02:05+5:30
Amravati : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा इतिहास चाळताना पश्चिम वऱ्हाड आणि विशेषतः अकोला जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

The roar of Bhimgarjan echoed in the soil of Akola; Babasaheb's company is still preserved in 'that' room!
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा इतिहास चाळताना पश्चिम वऱ्हाड आणि विशेषतः अकोला जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. दलित राजकीय चळवळीला दिशा देणाऱ्या अनेक धोरणात्मक निर्णयांचे अकोला हे प्रमुख केंद्र राहिले आहे. याच चळवळीच्या पाऊलखुणा शोधताना बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा बुद्रुक येथील ती शाळा आणि अकोल्यातील अभूतपूर्व मिरवणुकीच्या आठवणी आजही कार्यकर्त्यांच्या अंगावर रोमांच उभे करतात.
पातुर्डा येथील तीन दिवसांचा मुक्काम
बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, पातुर्डा बु. येथे २९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आगमन झाले होते. या शाळेत बाबासाहेबांनी सलग तीन दिवस मुक्काम केला होता. चळवळीच्या पुढील वाटचालीसाठी हा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा ठरला. विशेष म्हणजे, अकोल्यात बाबासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधून चळवळीची धोरणात्मक विचारसरणी स्पष्ट केली होती.
अकोल्यात निघाली अभूतपूर्व मिरवणूक
अकोला रेल्वे स्टेशनपासून ते टिळक मैदानापर्यंत काढण्यात आलेली बाबासाहेबांची मिरवणूक ही अकोलाकरांसाठी एक ऐतिहासिक सोहळा होता. स्त्री-पुरुषांची तुडुंब गर्दी, ढोल-ताशांचा निनाद आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या मिरवणुकीत अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पी. एन. राजभोज, फेडरेशनचे अध्यक्ष सुबैया, कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष सज्जनसिंग आणि नाशिकच्या झुंजार नेत्या शांताबाई दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध संचलनाने या मिरवणुकीची शोभा द्विगुणित केली होती.
संशोधकांसाठी प्रेरणास्थान
ज्या शाळेच्या खोलीत बाबासाहेबांचे वास्तव्य होते, त्या खोलीला नुकतीच बडनेरा येथील नारायणराव राणा महाविद्यालयाच्या पीएचडी रिसर्च सेंटरच्या वतीने भेट देण्यात आली. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आजही प्रेरणा देत आहे. संशोधन चमूत डॉ. सतोष बनसोड, प्रा. जगदिश गोवर्धन आदींचा समावेश होता.