'डीपीसी'तून जिल्ह्याला मिळणार ९०० कोटी; १२ पीएम मित्रा पार्कपैकी एक पार्क अमरावतीमध्ये होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:01 IST2025-02-22T11:57:57+5:302025-02-22T12:01:01+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : केंद्रीय अर्थसंकल्पावर फोकस; शहराला सीसीटीव्हीचा विळखा

The district will get 900 crores from 'DPC'; One of the 12 PM Mitra Parks will be in Amravati
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा विकास समितीच्या माध्यमातून तब्बल ९०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली. ना. बावनकुळे हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारच्य योजना, निधीच्या तरतुदीची माहिती सांगितली. पालकमंमत्र्यांनी जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवी राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता महापात्रा आदी उपस्थित होते. सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय असल्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था करा
जिल्हा परिषदेत आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने 'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.
डिजिटल शाळांसाठी सीएसआरमधून निधी
सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी एसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
अर्थसंकल्पावरही फोकस
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचे अत्यंत महत्त्वाचे बजेट मांडले आहे. हे अतिशय चांगले आहे. आता १२ तास असलेल्या उन्हापासून सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती तयार केली जाणार आहे. ४.४ टक्के वित्तीय तूट भरून आणण्याकरिता प्रयत्न अर्थसंकल्पात आहे. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या स्थानी आली पाहिजे, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असल्याचे ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.