विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत

By गणेश वासनिक | Updated: July 28, 2023 22:43 IST2023-07-28T22:41:45+5:302023-07-28T22:43:08+5:30

काही दिवसांपूर्वी वाघांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त

Smugglers target Tigers in Vidarbha and locals help for hunting | विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत

विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत

गणेश वासनिक, अमरावती: दिल्ली वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने २९ जून २०२३ रोजी दिलेल्या निर्देशानुसार मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्त चमू तसेच पोलिसांच्या संयुक्त चमुने २३ जुलै २०२३ रोजी गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी धाडसत्र राबविले. यात वाघांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य, धारदार शस्त्रे, तीन वाघ नखे व ४६ हजार रूपये रोख जप्त करण्यात आले. यावेळी संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

यापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मध्य प्रदेशातील कटनी येथील बहेलिया टोळी वाघ तस्करीत सामील होती. मात्र, मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईने बहेलिया टोळीला जेरबंद करून कारागृहात रवानगी करण्तात आली. तेव्हापासून मेळघाटात वाघांच्या शिकारी थांबल्या आहेत. मात्र आता आसाम, हरियाणा, तेलंगाणा ते पंजाब राज्यातील बावरीया टोळीने वाघ तस्करीचे जाळे विणले आहेत. या टोळीचे चंद्रपूर, गडचिरोली पर्यंत कनेक्शन असून, स्थानिकांच्या मदतीने वाघ शिकारीची माेहीम फत्ते करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आवश्यक

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन रखडल्याने वाघांचे संवर्धन, संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अद्यापही १० गावांचे पुनर्वसन झाले नसून ५५ कोटी निधीची गरज आहे. पेंच मध्ये ११० लोकसंख्येच्या फुलझरी या गावचे पुनर्वसन रखडले आहे. ५७ जणांचा पुनर्वसनाला नकार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २४४ कुटुंब संख्या असलेल्या रानतडोदी या गावचे पुनर्वसन थांबले आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यत पाच गावांचे पुनर्वसन झाले आहे. एकमात्र रानतडोदी हे गाव राहिले असून, पावसाअभावी ते थांबले आहे. पुनर्वसन करताना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याकडे भर आहे. -जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अधारी व्याघ्र प्रकल्प

Web Title: Smugglers target Tigers in Vidarbha and locals help for hunting