Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:22 IST2025-12-21T12:55:54+5:302025-12-21T13:22:34+5:30
Amravati : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज आता हटणार आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींचे निकाल समोर येत आहेत.

Results of mayors of 4 out of 12 municipalities in Amravati district declared; BJP wins two, Prahar and Congress one each
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज आता हटणार आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींचे निकाल समोर येत आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यातील १२ पैकी ४ पालिकांच्या नगराध्यक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. चांदूरबाजार नगरपरिषदेत प्रहारच्या मनिषा नांगलिया विजयी झाल्या. धारणी नगरपरिषदेत भाजपचे सुनील चौथामल, धामणगावमध्ये भाजपच्या अर्चना रोठे तर चिखलदरा नागरपरिषदेमध्ये कॉग्रेसचे शेख अब्दूल शेख हैदर विजयी झाले आहेत.
अचलपूर पालिकेत २० फेऱ्या असल्याने थोडा विलंब लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक प्रशासनाने सांगितले. यावेळी तुरळक अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष स्वतंत्र लढले. शिवाय प्रहार, युवा स्वाभिमान, वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्ष व स्थानिक आघाड्या, बंडखोर व काही अपक्ष उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. धामणगाव वगळता बहुतेक ठिकाणी अंतिम क्षणात तिहेरी लढती झाल्या.
२ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ३ ला मतमोजणी होती. मात्र, आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेसह अन्य चार पालिकेतील सहा सदस्यपदांसाठी २० डिसेंबरला मतदान झाले, त्यामुळे सर्व ठिकाणी २१ ला मतमोजणी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना १८ दिवस प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यात दोन टप्प्यात म्हणजेच २ व २० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामध्ये १५५ प्रभागात २७८ सदस्य निवडल्या जातील.
सदस्यपदासाठी ६१२ स्त्री व ६३८ पुरुष असे १२५० तर १२ नगराध्यक्ष पदांकरिता ४७ स्त्री व २४ पुरुष असे उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मतमोजणी प्रक्रियेसाठी टेबलनिहाय फेऱ्या होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक २० फेऱ्या अचलपूरमध्ये होणार आहे. यासाठी प्रत्येक टेबलवर ३ ते चार मतमोजणी अधिकारी व कर्मचारी आहेत.
विधानसभा निवडणूक पश्चात राजकारण बदलले आहे. दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघात महाविकास आघाडी (उद्धवसेना) आमदार व उर्वरित सात मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले. त्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
१,३२१ उमेदवार रिंगणात, कौल कुणाला?
तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक नगरपरिषद / नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने सर्व राजकीय पक्ष ताकदीने उतरले आहे. शिवाय नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेमधून होत असल्याने इच्छुकांची पर्यायाने अपक्षांची संख्या वाढली, तर महायुती व महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढल्याने उमेदवारांची संख्या वाढली.