वादळासह पाऊस, तरुण ठार, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST2021-03-20T05:00:00+5:302021-03-20T05:00:50+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा दुर्गम व अतिदुर्गम भागात गुरुवारी सायंकाळी ४ पासून अवकाळी पावसासह गारपीट झाली. काटकुंभ, चुरणी परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये गहू, चणा व पालेभाज्या घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना माहिती घेऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. अढाव येथे २७ घरांचे छप्पर उडाल्याची माहिती असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळासह पाऊस, तरुण ठार, पिकांचे नुकसान
लोकमत चमू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुरुवारी दुपारी ४ ते रात्री ८ च्या दरम्यान जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांमध्ये वादळासह गारपीट झाली. मुसळधार कोसळलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले, तर अंगावर वीज पडून पथ्रोट येथील तरुण ठार झाला.
पथ्रोट : वॉर्ड क्रमांक ३ मध्ये स्वत:च्या गोठ्यात काम करीत असलेला अविनाश गोल्हर (२९) याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याच घटनेत त्याच्या मालकीचा बैलदेखील अंगावर वीज कोसळून दगावला.
धामणगाव रेल्वे : गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात वीज कोसळल्याने बैलजोडी दगावली. एका शेतकऱ्याच्या शेतातील रोहित्र जळून खाक झाले. या घटना अंजनवती सैदापूर व वाढोणा येथे घडल्या.
धामणगाव तालुक्यात गुरुवारी रात्री आठ वाजता वादळी पाऊस व विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. अंजनवती येथील शुभम नरेंद्र पंचबुद्धे यांच्या शेतात बैलजोडी बांधली होती. वीज कोसळल्याने एक लाख रुपये किमतीची ती बैलजोडी जागीच ठार झाली. वाढोणा येथील प्रणित प्रकाश गायकवाड यांच्या शेतातील रोहित्रावर वीज कोसळल्याने ते खाक झाले. धामणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य राजकुमार केला यांनी केली.
अंजनसिंगी : गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वादळासह पाऊस पडला. यात गव्हाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले. मोसंबीची झाडे उन्मळून पडली. अंजनसिंगी तसेच तिवसा तालुक्यातील आलवाडा, बोर्डा, दुर्गवाडा, धारवाड या परिसरामध्ये वादळाने थैमान घातले. रस्त्यावरची मोठी झाडे उन्मळून पडली. मौजा आलवाडा येथे राजाभाऊ मनोहरे यांच्या शेतातील मोसंबीची झाडे वादळामुळे उन्मळून पडली.
दर्यापूर/अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव व शेजारच्या परिसरात तुरळक गारपीट झाली. यात पानपिपरी, गहू व अन्य पिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात काही गावात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती आहे. काही ठिकाणी उभ्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान पावसासह गारपीट झाली. चमक, सुरवाडा, देवरी, खांबोरा, नायगाव, तुळजापूर, बळेगाव गावांत कांदा व गव्हाचे नुकसान झाले.
धारणीत दुसऱ्या दिवशीही मुसळधार
धारणी : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी गारपिटीसह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. त्यात हरभरा व गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पुन्हा अवकाळी पावसाने एक तास तालुक्यात हजेरी लावल्यामुळे चना, गहू, मका या पिकांवर अवकाळीचा कहर झाला. ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार अतुल पाटोळे यांनी अधिनस्थ तलाठ्यांना केले आहे.
अढाव येथे २७ घरांचे छप्पर उडाले : दहेंद्री येथे बैल ठार
चिखलदरा : गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीने शेतीचे नुकसान झाले आहे. अढाव गावात वादळी वाऱ्याने २७ घरांचे छप्पर उडाले. दहेंद्री येथे एक बैल ठार झाला. महसूल प्रशासनाने शुक्रवारपासून पंचनाम्यास सुरुवात केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा दुर्गम व अतिदुर्गम भागात गुरुवारी सायंकाळी ४ पासून अवकाळी पावसासह गारपीट झाली. काटकुंभ, चुरणी परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये गहू, चणा व पालेभाज्या घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना माहिती घेऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. अढाव येथे २७ घरांचे छप्पर उडाल्याची माहिती असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली.
तिवसा तालुक्याला वादळाचा फटका
कुऱ्हा : १८ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास तिवसा तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाटात गहू, चणा, संत्रा आदी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील कुऱ्हा, वऱ्हा, घोटा, माळेगाव, चेनुष्ठा, बोर्डा, हसनापूर, आलवाडा, दुर्गवाडा, जहागीरपूर, मारडा, वंडली, मिर्चापूर, छिदवाडी, कौंडण्यपूर, अंजनवती, मसदी, वाढोणा, सालोरा खुर्द आदी भागांत पिकांचे नुकसान झाले. काही भागात घरांचे नुकसान झाले. कुठे मोठी झाडे उन्मळून पडली. वीज रात्रभर गूल होती.
पहूर येथील घटना : दोन चिमुकली बचावली
नांदगाव खंडेश्वर : गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पहूर या गावातील रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे १२५ वर्षांचे पुरातन कडुनिंबाचे झाड दोन घरांवर कोसळले. टीनपत्र्याचे छत असलेल्या घरात सहा महिन्यांचा नैतिक पाळण्यात होता. झाड कोसळण्यापूर्वीच त्यामधून त्याला काढण्यात आले होत. याशिवाय आईच्या कुशीत अडीच वर्षांची आराध्या होती. त्यांच्यासह घरातील कुटुंबीय या घटनेत थोडक्यात बचावले.
कडुनिंबाचे झाड नामदेव मारबदे व राजू मारबदे यांच्या घरावर कोसळले. नामदेव मारबदे यांच्या घरात पती, पत्नी, मुले, नातवंडे यांच्यासह एकूण आठ जण वास्तव्याला आहेत. झाड कोसळल्यामुळे घराच्या टिनाला आधार असलेल्या लाकडी नाटा तुटल्या. त्याच एका नाटीला पाळणा बांधला होता. राजू मारबदे यांच्या घरात पती, पत्नी, दोन मुले असे चार जण वास्तव्याला होते. या घरातील कुटुंबीय थोडक्यात बचावले. सरपंच अमृता जेठे, ग्रामपंचायत सदस्य सूरज ठाकरे, गायत्री गजानन गावंडे, विभा गजानन मेश्राम, विजय मारबदे, विनोद कडू, मोरेश्वर भेंडे, पुंडलिक मारबदे, विठोबा मारबदे घटनास्थळी दाखल झाली.