‘उत्तरपत्रिका कचऱ्यात’ मुद्दा सिनेटमध्ये गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:51+5:30
‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कचऱ्यात उत्तरपत्रिका आढळल्याचा मुद्दा येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेटमध्ये गाजणार आहे. राज्यपालनामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, औचित्याच्या मुद्दा ठरवित याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले. मात्र, सिनेट सदस्य मनीष गवई यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे साधन मानले जाते. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवल्या जात नसतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे सुरक्षित असणार, असा प्रतिप्रश्न मनीष गवई यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
मनीष गवई यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. मूल्यांकनात त्रुटी, उशिराने निकाल, परीक्षा केंद्रांवर वेळेत प्रश्नपत्रिका न पोहोेचणे, परीक्षेच्या वेळापत्रकात चुका, गुणपत्रिकांमध्ये गोंधळ अशा एक ना अनेक मुद्द्यांवर परीक्षा विभाग ‘फेल’ ठरला आहे. परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांची धुरा सांभाळणाºया माइंड लॉजिक एजन्सीच्या करारनाम्यावर गवई यांनी आक्षेप नोंदविला आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे उत्तरपत्रिका कचºयात गेल्याचा आरोप सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केला आहे.
उत्तरपत्रिका कचऱ्यात कशा गेल्यात? याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा औचित्याचा ठरवून सिनेटमध्ये या विषयावर मुद्देसूद चर्चेद्वारे घणाघात करण्यात येणार आहे.
- मनीष गवई, सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ.