राज्यातील सिंचनाचा दुष्काळ संपणार; नाबार्डकडून ५४५ कोटींचा बूस्ट, तीन बड्या प्रकल्पांचे भाग्य उजळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:50 IST2026-04-02T12:49:55+5:302026-04-02T12:50:58+5:30
Amravati : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने 'नाबार्ड'कडून ५४५ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

Irrigation drought in the state will end; NABARD will provide a boost of Rs 545 crore, the fortunes of three big projects will brighten
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने 'नाबार्ड'कडून ५४५ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांच्या कामांना मोठी गती मिळणार आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंपदा विभागाच्या भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द (राष्ट्रीय प्रकल्प), अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी आणि जळगाव जिल्ह्यातील वाघूर या प्रकल्पांचा यात समावेश आहे. या तीनही प्रकल्पांच्या राज्य हिश्श्यासाठी लागणारा निधी आता 'दीर्घ मुदतीचा पाटबंधारे निधी' अंतर्गत उपलब्ध होणार आहे. शासन निर्णयानुसार, मंजूर झालेल्या ५४५.१४ कोटी रुपयांच्या एकूण कर्जापैकी सर्वाधिक निधी जळगावच्या वाघूर प्रकल्पाला मिळणार आहे. वाघूर प्रकल्पासाठी ४३७.३२ कोटी रुपये, अमरावतीच्या निम्न पेढी प्रकल्पासाठी १०२.५२ कोटी रुपये, तर गोसेखुर्द प्रकल्पासाठी ५.३० कोटी रुपयांच्या कर्ज रकमेचा समावेश आहे. या निधीमुळे प्रकल्पांची उर्वरित कामे, कालव्यांची जोडणी आणि इतर तांत्रिक अडथळे दूर होण्यास मदत होईल.
कर्जाच्या अटी आणि कालावधी
हे कर्ज १५ वर्षांच्या मुदतीसाठी घेण्यात आले. यामध्ये सुरुवातीची ३ वर्षे ही सवलतीचा कालावधी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहेत. या कालावधीनंतर मुद्दलाची परतफेड समान वार्षिक हप्त्यांमध्ये केली जाईल. व्याजाचा दर नाबार्डच्या निधी उभारणी खर्चावर आधारित असेल. या निर्णयामुळे अमरावती, भंडारा आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधीअभावी रखडलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
असा आहे गोसेखुर्द प्रकल्प
गोसेखुर्द हा महाराष्ट्रातील एकमेव 'राष्ट्रीय सिंचन प्रकल्प' आहे. विदर्भात हरितक्रांती घडविण्यासाठी पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली. १९८३-८४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळाला. ३८ वर्षांनंतर जानेवारी २०२६ मध्ये तो पूर्ण क्षमतेने भरला आहे. हा प्रकल्प सुरुवातीला ३७२ कोटी रुपयांचा होता, पण दीर्घ विलंबामुळे त्याचा खर्च २५,००० कोटी रुपयांच्या वर गेला आहे.
असा आहे निम्न पेढी, वाघूर प्रकल्प
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निभास्थित पेढी नदीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. अप्पर वर्धानंतरच्या व दोन हजार कोटींवर पोहोचलेल्या जिल्ह्यातील या दुसऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित आहे. तर वाघूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण वाघूर नदीवर बांधण्यात आले असून, ते जळगावसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे.