लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील टॉप टेन शहरांत अमरावती आहे. हा एक प्रकारचा अलर्ट आहे. जिल्ह्यात ३३८ दिवसांत ४१ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यात सर्वाधिक २५ हजारांवर रुग्णसंख्या अमरावती महानगरातील आहे. शहरातील प्रत्येक १०० नागरिकांपैकी तीनपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे.सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ या महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट शहरात झाला. आता तर कुटुंबचे कुटुंब संक्रमित होत आहेत. शहरात आतापर्यंत १०,७७५ रुग्णांनी ‘होम आयसोलेशनची’ सुविधा घेतल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झाला. मात्र, या रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यामुळे संक्रमणात वाढ झाली, हेदेखील तेवढेच खरे.शहरात पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतरचे चार महिने सातत्याने सर्वेक्षण, आशांच्या गृहभेटी, हॉट स्पॉटमध्ये स्वॅब सेंटर, कंटेनमेंट झोन व आयुक्त प्रशांत रोडे यांचे सूक्ष्म नियोजन यामुळे हॉट स्पाॅटमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला यश आले. मात्र, त्यानंतर शहराच्या इतर भागातही कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यावर रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सोबतीला नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाची जोड आवश्यक आहे.
परिस्थिती नियंत्रणात, जिल्हाधिकाऱ्यांची माहितीसंक्रमणाच्या प्रमाणासाठी प्रशासनाद्वारा एक मिलियन व त्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह असे प्रमाण काढले जाते व यानुसार नागपूर, पुणे, सांगली, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगरनंतर अमरावती शहराचा क्रमांक आहे. राज्यातील टॉप टेन संक्रमित शहरांमध्ये अमरावतीचा समावेश असला तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. महापालिका प्रशासन चांगले काम करीत असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
‘त्या’ रुग्णांवर कारवाई करा, आयुक्तांचे निर्देशमहापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील काही रुग्णांद्वारा नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पथकांना आयुक्त प्रशांत रोडे यांनी निर्देशित केले आहे. आता पथकांद्वारे या रुग्णांची नियमित चौकशी व त्यांच्या घरांना भेटी दिल्या जात आहेत. या चार दिवसांत सहा रुग्णांवर कारवाई करून दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.