अमरावतीमध्ये ७२ हजार वाहन चालकांकडे ४.५८ कोटींचा दंड थकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:31 IST2024-07-29T12:15:22+5:302024-07-29T12:31:12+5:30
८६ टक्के दंड वसुली थकली : महिन्याकाठी वाढत चालली आहे अनपेड ई-चलानची रक्कम

In Amravati, 72,000 motorists have fines of 4.58 crores
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण पोलिस दलातील जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते जूनदरम्यान तब्बल ९८ हजार ६८३ वाहन चालकांना ई-चलानने ५ कोटी २८ लाख ७४ हजार रुपये दंड ठोठावला. त्यातील केवळ १४ टक्के, अर्थात २६ हजार २२३ वाहन चालकांनी ७० लाख ५२ हजार ८०० रुपये दंड भरला, तर तब्बल ७२ हजार ४६० वाहनधारकांनी त्यांच्याकडे असलेला ४ कोटी ५८ लाख २१ हजार २०० रुपये दंड भरलाच नाही. ती रक्कम अनपेड राहिली. अर्थात, ती रक्कम त्या वाहन चालकांनी भरलीच नाही. दर महिन्यात, दरवर्षी त्या अनपेड चलनाच्या रकमेत कोट्यवधींची वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतुकीविषयीच्या उपाययोजना राबविण्यास मर्यादा येत आहेत.
"ग्रामीण वाहतूक शाखेने सहा महिन्यांत वाहनधारकांना ५.२८ कोटी रुपयांचा दंड ई-चलानने आकारला. पैकी ७०.५२ लाख रुपये भरले. अनपेड चलानची रक्कम ४.५८ कोटीं आहे. चलानधारकांनी थकीत दंड त्वरित भरावा."
- सतीश पाटील, पीआय, जिल्हा वाहतूक शाखा
दीड वर्षात १४ कोटी रुपये थकले
ग्रामीण वाहतूक शाखेने २०२३ या वर्षभरात एकूण २ लाख १२ हजार ४३८ वाहन चालकांना १०.६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यापैकी केवळ १ कोटी ७८ लाख ९१ हजार ६५० रुपये दंड वसूल केला, तर तब्बल ८.८८ कोटी रुपये दंड थकला आहे. यंदाच्या सहा महिन्यांत अनपेड चलानमध्ये ५.२८ कोटींची भर पडली आहे.
१४९ चलानधारक कोर्टात
- अनपेड चलानधारकांनी त्यांच्या वाहनांवरील दंड वाहतूक शाखेसह जवळच्या पोलिस ठाण्यात भरावा.
- दंड थकीत राहिल्यास संबंधित वाहनधारकांचा परवाना निलंबित केला जातो.
- प्रसंगी तो रद्ददेखील केला जातो, तसेच दंडाकडे पाठ फिरविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध न्यायालयात खटला भरला जातो.
- ते टाळण्यासाठी वाहन चालकांनी आपल्याकडे थकीत दंडाची रक्कम त्वरेने भरावी, असे आवाहन ग्रामीण वाहतूक शाखेने केले आहे. १४९ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत.