नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:43 IST2024-06-27T13:40:11+5:302024-06-27T13:43:17+5:30
Amravati : सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा

If the school opens before nine, you will get a notice
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या शाळांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली जाणार आहे. अनेक शाळा नियम करूनही जर सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अनेक शाळांनी या निर्णयाचे पालन केले नाही. शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा मांडून राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याबाबत शासननिर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निर्णयाच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक मुद्देही उपस्थित करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनीही या निर्णयाला विरोध केला. शैक्षणिक वर्षात बदल केला आहे, तर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून वेळ ठरवली.
काही शाळांनी मात्र या निर्णयाचे पालन केलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत विषयांबरोबरच शाळेच्या वेळेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही झाली. प्राथमिक शिक्षण संचालकांनी, राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या चौथीपर्यंतच्या शाळा शासनाच्या निर्णयानुसार सकाळी नऊनंतरच भरवणे आवश्यक आहे. सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली पाहिजे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना परवानगी न घेता सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या आदेशाचे पालन योग्य रितीने होणे आवश्यक आहे. ९ पूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी जर शाळा ९ पूर्वी भरविली जात असल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाई होईल. इतर चर्चा
-बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक