बच्चू कडूंची प्रकृती खालावली तर महाराष्ट्र पेटून उठेल - संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:27 IST2025-06-13T13:26:06+5:302025-06-13T13:27:24+5:30
Amravati : गुरुकुंजातून सरकारला इशारा, कृषिमंत्र्यांवर टीका

If Bachchu Kadu's health deteriorates, Maharashtra will rise in flames - Sambhaji Raje
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : सर्वसामान्यांचे सरकार असे संबोधन महायुतीचे सरकार नेहमी करते. मग बच्चू कडू हे वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत काय? त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत काय? कर्जमाफीच्या आश्वासनावर चर्चा का करीत नाही? बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
कृषी कर्जमाफीसह १७ मुख्य मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष नेते बच्चू कडू यांनी गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे बेमुदत अन्नत्याग उपोषण ८ जूनपासून सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचीही उपस्थिती होती. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, आ. रोहित पवार, खा. अमर काळे, यवतमाळ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगरूळकर यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली.
संभाजीराजे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, कोट घालून फिरणाऱ्या कृषिमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधला होता, असे सांगितले. ही वेळ फोनवरून बोलण्याची नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने लवकरात लवकर हा विषय सोडवला पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे होते. त्यांचा वंशज म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे घराणे उभे आहे, हा संदेश देण्यासाठी मी गुरुकुंजात आलो आहे. महाराष्ट्रातील संयमी, कष्टाळू शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा पंजाबसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होईल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
महत्त्वाच्या नोंदी
- राजू शेट्टी यांनी १३ जून रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात बंदची हाक दिली आहे.
- छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलन स्थळाहूनच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट मोबाइलवर संपर्क साधत झापले.
- बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ झटामझिरी धरणात जलसमाधी आंदोलन, नांदगाव पेठ टोलनाक्यावर 'प्रहार'चे रास्ता रोको, टायर जाळले, डवरगाव येथे अर्धदफन आंदोलन, प्रहारचे धामणगाव बंद, महिलांचे नागपूर हायवेवर मोझरी जवळ रास्ता रोको आंदोलन.
- पालकमंत्री बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मौदा तहसील कार्यालयाचे कामकाज प्रहारने बंद पाडले. प्रवेशद्वारावरच ठिय्या.